पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये सीमाभागात झालेल्या लघु युद्धाला आता विराम लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना युद्ध स्थगित केले आहे, संपविलेले नाही असा दम भरला आहे. सीमेवर बंदुका, तोफा थंडावल्या आहेत. परंतू, काल रात्री पाकिस्तानने ड्रोन पाठवून थोडी आगळीक केली होती. यामुळे संभाव्य धोका अद्याप टळला नसल्याने एअर इंडिया आणि गो इंडिगोने सीमा भागातील राज्यांच्या विमानफेऱ्या रद्द केल्या आहेत.
सध्या सीमेवर शांती आहे, सीमेवरून जाणाऱ्या विमानमार्गांना धोका आहे. यामुळे कंपन्या अलर्ट मोडवर असून या भागातून जाणाऱ्या विमानांसाठी नवीन एडवायझरी जारी करण्यात आली आहे.
भारत सरकारने सोमवारीच सर्व विमानतळांवरील विमान परिचालनावरील बंदी उठविली होती. तसेच आपल्या कंपन्यांशी संपर्क साधावा, असे प्रवाशांना कळविण्यात आले होते. यामुळे आजपासून या विमानतळांवरील विमानसेवा पूर्ववत होईल असे सर्वांना वाटत होते. परंतू, एअर इंडियाने आज आठ प्रमुख शहरांच्या विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा कारणांमुळे या सेवा रद्द करण्यात आल्याचे कारण कंपनीने दिले आहे. प्रभावित विमानतळांमध्ये जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट यांचा समावेश आहे.
तर गो इंडिगोने देखील विमानसेवा रद्द केल्या आहेत. इंडिगो एअरलाइन्सने मंगळवार, १३ मे रोजी जम्मू, अमृतसर, चंदीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोट येथे जाणारी सर्व उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली आहे. दोन्ही एअरलाईन्सनी सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. बंद असलेल्या मार्गांवर सेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर काही तासांतच इंडिगोने ही अपडेट दिली होती.