पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत घेतलेला या हल्ल्याचा बदला, यावरून सुरू झालेलं राजकारण काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर शाब्दिक चिखलफेक सुरू केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. जयराम रमेश यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना सरकारने विविध देशांत पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळातील खासदारांची तुलना दहशतवाद्यांसोबत केली. त्यावरून भाजपाने रमेश यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
जयराम रमेश म्हणाले की, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी मागच्या १८ महिन्यात चार हल्ले केले आहेत. आमचे खासदार सध्या इकडे तिकडे फिरत आहेत आणि हे दहशतवादीही इकडे तिकडे फिरत आहेत, असं विधान त्यांनी केलं. त्यावरून भाजपा आक्रमक झाली आहे. भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, जयराम रमेश यांनी आमच्या लोकप्रतिनिधींना दहशतवाद्यांच्या रांगेत उभं केलं आहे. ही काँग्रेसची तीच मानसिकता आहे जी भारताच्या मुत्सद्देगिरी आणि लष्करी प्रयत्नांना कमकुवत करते. आता संसदेने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.
शाहजाद पूनावाला पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख किरकोळ असा करून जवानांच्या शौर्याचा अपमान करतो. तसेच जागतिक स्तरावर भारत करत असलेल्या प्रयत्नांचीही खिल्ली उडवतो.
दरम्यान, आपल्या विधानावरून वादाला तोंड फुटल्यावर जयराम रमेश म्हणाले की, माझा हेतू केवळ भाजपाला पिंजऱ्यात उभं करण्याचा होता. भाजपा दहशतवाद्यांना सोडून काँग्रेसवर हल्ले करत आहे. खरंतर जिथून धोका आहे तिथे हल्ला झाला पाहिजे, असा टोला जयराम रमेश यांनी लगावला. मात्र भाजपाने जयराम रमेश यांचा हा दावा फेटाळून लावला आहे.