रस्ते बांधल्याबद्दल मिळालं नोबेल - भाजपा नेत्यांनी तोडले तारे
By Admin | Updated: December 12, 2014 21:26 IST2014-12-12T18:00:16+5:302014-12-12T21:26:24+5:30
एमपीमधल्या भाजपा सरकारमधल्या अनेक नेत्यांना सत्यार्थींना नोबेल मिळाल्याची गंधवार्ताही नव्हती.
रस्ते बांधल्याबद्दल मिळालं नोबेल - भाजपा नेत्यांनी तोडले तारे
>ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. १२ - मध्प्रदेशातल्या विदीशा येथील कैलाश सत्यार्थी यांना बालकामगार क्षेत्रामध्ये तसेच मुलांच्या कल्याणासाठी गेल्या ३५ वर्षांत दिलेल्या योगदानाबद्दल नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आले आणि जगभरात त्यांचा सन्मान करण्यात आला. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे खुद्द एमपीमधल्या भाजपा सरकारमधल्या अनेक नेत्यांना याची गंधवार्ताही नव्हती. अनेक नेत्यांनी तर वृत्तवाहिन्यांना बाईट देताना हा पुरस्कार भाजपा आमदार कैलाश विजयवर्गीयांनाच मिळाल्याची समजूत करून घेत भाजपा सरकारचं व विजयवर्गीयांचं गुणगान सुरू केलं. एका नेत्यानं सांगितलं की इंदोरमधले रस्ते कैलाशजींनी खूप चांगले केले, इंदोर सिटी निर्माण करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
तर एका नेत्यानं चक्क केंद्रात मोदी व राज्यात शिवराजसिंह चौहान चांगलं काम करत असल्यामुळं नोबेल मिळाल्याचं ठोकून दिलं आणि आम्हा सगळ्या भाजपा कार्यकर्त्यांचंच हे यश असल्याचं सांगितलं. एकीकडे देशात सत्यार्थींच्या पुरस्कारामुळं आनंदाचं वातावरण असताना त्यांच्या राज्यातल्या सत्ताधारींना मात्र सत्यार्थींचं काम आणि त्यांचा जागतिक पातळीवर झालेला गौरव याची गंधवार्ताही नसल्याचं समोर आलं आहे. आणखी वाईट बाब म्हणजे असे तारे तोडणा-यांमध्ये मध्यप्रदेशच्या कायदा मंत्र्यांचाही समावेश आहे. अखेर कैलाश विजयवर्गीयांना जेव्हा हे सगळं समजलं, त्यावेळी त्यांनी सत्यार्थी हे भूमिगत राहून काम करतात त्यामुळे लोकांना त्यांची माहिती नाही, मी मात्र आमदार असल्यामुळे प्रसिद्धीत असतो त्यामुळे गैरसमज झालेला अशी सारवाासारव केली.
कैलाश सत्यार्थींना त्यांच्या राज्यातल्या सत्ताधारी नेत्यांचं अज्ञान समजलं तर त्यांची काय अवस्था होईल याची कल्पनाच केलेली बरी.