नितीशकुमार यांच्या महाआघाडीत फूट
By Admin | Updated: August 15, 2015 01:42 IST2015-08-15T01:42:46+5:302015-08-15T01:42:46+5:30
बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीत निवडणुका जाहीर होण्याआधीच बिघाडीची सुरुवात झाली आहे. केवळ तीन जागा मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने

नितीशकुमार यांच्या महाआघाडीत फूट
पाटणा : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीत निवडणुका जाहीर होण्याआधीच बिघाडीची सुरुवात झाली आहे. केवळ तीन जागा मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी रोष व्यक्त केला असतानाच शुक्रवारी समाजवादी पार्टीने एकही जागा न मिळाल्याच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
आपल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे, असे सांगत सपाने विधानसभा निवडणुकीत ‘उचित वाटा’ मिळण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला. राष्ट्रवादीने १२ जागा मागितल्या असताना केवळ तीन जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादीने हा आपला अवमान असल्याचे म्हटले होते. संयुक्त जनता दल आणि राजदने प्रत्येकी १००, तर काँग्रेसने ४० जागा घेतल्या आहेत. या जागा वाटपात सपाला भोपळा मिळाला.
लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांना एकत्र आणण्यात आणि महाआघाडी स्थापन करण्यात सपाने मोठी भूमिका बजावली; पण जागा वाटपाच्या वेळी सपाला पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आले. जागा वाटप करताना आमच्याशी साधा संपर्कही साधला गेला नाही. या वागणुकीविरुद्ध आम्ही बेमुदत उपोषण आरंभ केले आहे, असे सपाचे प्रदेशाध्यक्ष रामचंद्र यादव यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)