छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलावर नक्षलवादी हल्ला, दोन आयटीबीपी जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 16:12 IST2021-08-20T16:10:28+5:302021-08-20T16:12:01+5:30
नक्षलवाद्यांनी जवानांकडून एके -47 रायफल देखील लुटली आहे.

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलावर नक्षलवादी हल्ला, दोन आयटीबीपी जवान शहीद
रायपूर: छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आयटीबीपीचे दोन जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी कडेमेटा कॅम्पपासून 600 मीटर अंतरावर सैनिकांवर हल्ला केला. यानंतर जवानांकडून एके -47 रायफल, दोन बुलेटप्रूफ जॅकेट आणि वॉकी टॉकी लुटून नक्षलवादी पळून गेले.
चार दिवसांपूर्वी सुरक्षा दलांनी नक्षल प्रभावित दंतेवाडा जिल्ह्यात तीन नक्षलवाद्यांना अटक केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी नक्षलवाद्यांनी ही कारवाई केल्याचे मानले जात आहे. सुरक्षा दलांनी दंतेवाडाच्या कुआकोंडा पोलीस स्टेशन परिसरातून तीन नक्षलवादी हंगा कर्टम (25), आयता माडवी (25) आणि पोज्जा उर्फ लाठी कर्तम (28) यांना अटक केली.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी पोलिसांचे पथक कुआकोंडा पोलीस ठाण्यातून बडेगुद्रा आणि अतेपाल गावाच्या दिशेने पाठवण्यात आले होते. जेव्हा टीम अतेपाल गावाजवळ जंगलात होती, तेव्हा तीन संशयित पळून जाऊ लागले. पोलिसांच्या पथकाने घेराव घातला आणि त्यांना पकडले. जेव्हा पोलीस पथकाने त्यांची चौकशी केली तेव्हा त्यांनी त्यांची नावे हंगा कर्तम, आयता माडवी आणि पोज्जा उर्फ लाठी कर्तम असल्याचे सांगितले.