काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अचानक केलेल्या युद्धविरामावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केला. नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावरून सरेंडर केलं, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं परराष्ट्र धोरण आणि पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ते म्हणाले की, तिकडून डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि म्हणाले की, मोदीजी काय करत आहात? नरेंदर, सरेंडर, त्यानंतर जी हुजूर म्हणत नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याचं पालन केलं.
यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं उदाहरण देत राहुल गांधी म्हणाले की, तुम्हाला एक काळ माहिती असेल जेव्हा फोन नाही तर सातवं आरमार आलं होतं. मात्र तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की, मला जे करायचं आहे ते मी करेन. हाच फरक आहे. यांचं व्यक्तिमत्त्वच असं आहे. यांना स्वातंत्र्याच्या काळापासून सरेंडरवालं पत्र लिहिण्याची सवय आहे. थोडासा दबाव आला की, हे लोक लगेच सरेंडर करतात. काँग्रेस पार्टी सरेंडर करत नाही. महात्मा गांधीजी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल. ही मंडली सरेंडर करणारी नाही तर महाशक्तीसोबत लढणारी होती.
यावेळी राहुल गांधी यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बोचरी टीका केली. ते म्हणाले की, आज देशामध्ये विचारधारेची लढाई सुरू आहे. एकीकडे काँग्रेस पक्ष आणि राज्यघटना आहे. तर दुसकडे भाजपा आणि संघ आहे जो या राज्यघटनेला संपवू इच्छित आहे. देशातील सर्व घटनात्मक संस्था भाजपा आणि संघाच्या नियंत्रणाखाली गेल्या आहेत. त्यांनी सर्व संस्थांमध्ये आपल्या विचारांची माणसं बसवली आहेत. तसेच ते हळुहळू देशाचा गळा आवळत आहेत.