धरमलेवाडीवर शोककळा
By Admin | Updated: May 13, 2014 00:56 IST2014-05-12T22:59:21+5:302014-05-13T00:56:04+5:30
पाच जणांच्या अपघाती मृत्यूने ग्रामस्थ सून्न : धक्का बसल्याने १५ जणांवर उपचार

धरमलेवाडीवर शोककळा
पाच जणांच्या अपघाती मृत्यूने ग्रामस्थ सून्न : धक्का बसल्याने १५ जणांवर उपचार
सोळांकूर/राधानगरी : मंदिराची वास्तुशांती आणि येथील तरुणाच्या लग्नाअगोदर पाच जणांच्या मृत्यूने ऐनी पैकी धरमलेवाडीवर शोककळा पसरली. गावातील आक्रोश, वेदना, चिमुकल्यांची भेदरलेली मुद्रा पाहून प्रत्यक्ष सांत्वनासाठी येणारेदेखील दु:खसागरात लोटल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. सारा गावच पै-पाहुण्यांचा, भाऊबंदकीचा कोणी कोणासाठी रडायचं हेच कोणाला कळेना.
राधानगरी तालुक्यातील अत्यंत दुर्गम असणार्या ऐनी पैकी धरमलेवाडी गावातील ग्रामस्थ नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिराच्या वास्तुशांतीचे साहित्य व मारुती धरमले यांच्या लग्नाच्या जथ्था काढून रविवारी रात्री घरी परतत असताना ऐनी हद्दीतील बांधा या ओढ्याजवळ जीप (एमएच १३ ए ४८२९) झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात पाचजण ठार तर बाराजण जखमी झाले. आज (सोमवारी) सर्वांना एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातील प्रामुख्याने पुढाकार घेणारे आणि घरचे कार्यकर्ते असणारे मृत्यूमुखी पडल्याने सारा गावचं उघड्यावर पडला आहे. प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती, लग्न जथ्था खरेदी करण्यासाठी जाण्याची जुनी परंपरा आजही या गावात आहे. गावातील वास्तुशांती खरेदी व लग्नाच्या जथ्था अशा एकत्रित खरेदीसाठी एकच गाडी करून गावातील प्रमुख गेले होते.
गावात अजून कोणत्याही सुविधा नाहीत. अवघ्या ४ वर्षापूर्वी गावात वीज आली आहे. शेतातील पिकांवर जंगली जनावरे ताव मारत असल्याने गावातील तरुण कामानिमित्त शहराकडे जातात. गावात १७ कुटुंबे असून लोकसंख्या १५० इतकी आहे. मृतातील नवरदेव मारुती पांडुरंग धरमले (वय २३) व त्यांचे वडील पांडुरंग दौलू धरमले या पिता-पुत्राचा लग्नाअगोदरच मृत्यू झाला. तर रंगराव शंकर वरूटे (वय ३२), सुनील गणपती कवडे (३०), अजित तुकाराम जाधव (३०) हे कुटुंब प्रमुखच मृत्यू पावल्याने चारीही कुटंुबे उघड्यावर पडली आहेत. गावातील आक्रोश पाहून त्यांची चिमुकली मुले भेदरली होती. सायंकाळपर्यंत कोणीही गावात चुल पेटवली नव्हती. सारा गाव भाऊबंदकी आणि पै-पाहुण्यांचा आहे. त्यामुळे सारा गावच एकत्र रडत दु:ख सागरात लोटला होता. सततच्या रड्यामुळे गावातील महिला अशक्त झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र सरवडे येथील पथकाला पाचारण केले होते. शेजारील गावामध्ये ही दुखवटा पाळला आहे.
अपघात रविवारी (११ मे) रात्री दहाच्या सुमारास झाला. हा भाग दुर्गम असल्याने मदत कार्यास विलंब झाला. जखमींना ग्रामीण रुग्णालय सोळांकूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. व्ही. गायकवाड यांच्या पथकाने प्रथमोपचार करून त्यांना सोळांकूर, राशिवडे, राधानगरी, मुरगूड येथील पाच रुग्णवाहिका मागवून पुढील उपचारासाठी पाठविले. अपघाताच्या ठिकाणी आर. वाय. पाटील, भिकाजी एकल, मधुकर रामाणे, संजय पाटील, बळवंत पाटील यांच्यासह ऐनी ग्रामस्थांनी मदत केली.
जखमी शंकर बाळू कवडे (वय ५०), बाजीराव कवडे २५) शिवाजी कुशाप्पा कवडे (३०), दिनकर कवडे (३०), विलास तुकाराम धरमले (४५), संजय भैरू धरमाले (२५), अरुण दामोदर कवडे (३०) सर्व ऐनी पैकी धरमलेवाडी, साऊताई नामदेव पाटील (वय ३५, फराळे) श्रीकांत साताप्पा करवळे (११, पंडेवाडी), साताप्पा दिनकर पाटील (ऐनी) यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातस्थळी ए. वाय. पाटील, भिकाजी एकल, प्रकाश आबीटकर, विजयसिंह मोरे यांनी भेट दिली.
चौकट
आणि काळाने घाला घातला...
जीपमधील डिझेल संपल्याने आरेगाव येथे थांबल्यावर मागून ऐनी मुक्कामी एस. टी. आली. थांबलेल्यांना पाहून एस. टी. चालकाने एस. टी.तून चला असे सांगितले. पण ऐनीतून ही वाडी पाच किमी दूर आहे. शिवाय सोबत ओझे, रात्रीची वेळ त्यामुळे सर्वांनी जीपमधूनच जाण्याचा निर्णय घेतला. आणि पुढे त्यांच्यावर काळाने घाला घातला.
-----
जीपमधील संजय भैरू धरमले हे बाहेर फेकल्याने साधे खरचटलेही नाही. त्यांचा मोबाईल पडला. मात्र त्यांनी जखमींपैकी कोणाचातरी मोबाईल घेऊन अपघाताची माहिती गावात दिली. यामुळे तात्काळ मदत मिळाली.
-----
वाडीत ग्रामस्थांनी रामलिंग देवालयाचा जिर्णोद्धार करून मंदिर नवीन बांधले आहे. त्याचा वास्तुशांती व न्य कार्यक्रम १९ मे रोजी आहे त्यामुळे मृत मारुतीच्या लग्नाचा मुहूर्त २० रोजी नको असे काही ग्रामस्थांचे मत होते.
-----
तहसीलदार शिवाजी शिंदे, पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांच्यावर शासकीय अधिकारी, राजकीय नेते, कार्यकर्ते व पै-पाहुण्यांची सांत्वनासाठी वाडीकडे रिघ लागली होती.
-----
अपघाताचा धक्का बसल्याने मृत व जखमींच्या अनेक नातेवाईकांना रक्तदाब, चक्कर असे प्रकार मोठ्या प्रमाणात झाले. सरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक दिवसभर येत होते. त्यांनी सोळा जणांवर वैद्यकीय उपचार केले. यामध्ये डॉ. डी. ए. शिंदे, ए. जी. नाईक, ए. एल. जासूद, एस. एस. चौगले, सी. के. पारखे यांचा समावेश होता.
फोटो - मेलवर