मोदी त्सुनामीत नितीश, लालू, सोरेन, मरांडी साफ!
By Admin | Updated: May 17, 2014 04:29 IST2014-05-17T04:29:08+5:302014-05-17T04:29:08+5:30
नरेंद्र मोदींच्या त्सुनामीत बिहार व झारखंडमधील इतर सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा साफ धुळीस मिळाली आहे.

मोदी त्सुनामीत नितीश, लालू, सोरेन, मरांडी साफ!
नरेंद्र मोदींच्या त्सुनामीत बिहार व झारखंडमधील इतर सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा साफ धुळीस मिळाली आहे. सदर वृत्तांत लिहीत असताना हाती आलेल्या, लोकसभा निवडणुकीच्या कल व निकालांनुसार, बिहारमधील एकूण ४० जागांपैकी ३१ जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने, तर सात जागा संयुक्त पुरोगामी आघाडीने जिंकल्या आहेत. जनता दल (युनायटेड)ला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. रालोआच्या घटकपक्षांपैकी भारतीय जनता पक्षाला २२, लोक जनशक्ती पक्षाला सहा, तर राष्ट्रीय लोक समता पक्षाला तीन जागा मिळाल्या. संपुआच्या घटक पक्षांमध्ये काँग्रेसने दोन, राष्ट्रीय जनता दलाने चार, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक जागा जिंकली. झारखंडमधील एकूण १४ जागांपैकी १२ जागांवर भाजपाने विजय मिळविला असून, उर्वरित दोन जागांपैकी प्रत्येकी एक जागा काँग्रेस व झारखंड मुक्ती मोर्चाच्या वाट्याला गेली आहे. बिहारमध्ये अपेक्षेनुरुप, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जद (यु)ला भाजपासोबत काडीमोड घेण्याचा जबरदस्त फटका बसला आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षाला केवळ दोन जागा मिळाल्यामुळे राज्यात लवकरच सत्ताबदल होण्याच्या चर्चेनेही जोर धरला आहे. दुसरीकडे, मोदींचा वारू रोखण्यासाठी मुस्लीम समुदायाने नितीश कुमार यांच्याऐवजी लालूप्रसाद यादव यांना पसंती देऊनही, राजद-काँग्रेस युतीलादेखील चमकदार कामगिरी करता आली नाही. लालूंच्या अर्धांगिनी राबडीदेवी व कन्या मिसा भारती या दोघींनाही पराभूत करून, बिहारी मतदारांनी एक प्रकारे त्यांना अंधारयुगात परतण्याची इच्छा नसल्याचेच संकेत दिले आहेत. बिहारी मतदारांप्रमाणेच झारखंडमधील मतदारांनीही प्रादेशिक पक्षांना साफ नाकारले आहे. झामुमोे नेते शिबू सोरेन व झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक)चे नेते बाबूलाल मरांडी यांच्यासाठी हा मोठा झटका आहे.