मोदी सरकारकडून जनतेच्या अवास्तव अपेक्षा - राजन
By Admin | Updated: May 20, 2015 16:32 IST2015-05-20T16:26:44+5:302015-05-20T16:32:32+5:30
मोदी सरकारने अपेक्षाभंग केल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली असतानाच रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारला दिलासा देणारे विधान केले आहे.

मोदी सरकारकडून जनतेच्या अवास्तव अपेक्षा - राजन
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - मोदी सरकारने अपेक्षाभंग केल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली असतानाच रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारला दिलासा देणारे विधान केले आहे. जनतेने मोदी सरकारकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या असून कोणत्याही व्यक्तीकडून अशा अवास्तव अपेक्षा ठेवणे चुकीचेच आहे असे सांगत रघुराम राजन यांनी मोदी सरकारची पाठराखण केली आहे.
मोदी सरकारला सत्तेवर येऊन वर्षभराचा कालावधी लोटला असला तरी देशातील जनतेला अद्यापही अच्छे दिनची प्रतिक्षा करावी लागत आहे. यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर टीका सुरु केली असून चोहोबाजूंनी सरकारची कोंडी केली जात आहे. पण आता मोदी सरकारला दिलासा देण्यासाठी रघुराम राजन मैदानात उतरले आहेत. न्यूयॉर्कमधील इकॉनोमिक क्लब येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले, लोकांच्या आशा अपेक्षांचे ओझं घेऊन मोदी सरकार सत्तेवर आले. लोकांच्या नजरेत मोदींची प्रतिमा 'रोनाल्ड रिगन ऑन व्हाईट हॉर्स'सारखी होती. मोदी सत्तेवर येताच देश विकासाच्या मार्गावर सुस्साट धावेल असे त्यांना वाटत होते, पण अशी आशा ठेवणे अयोग्य आहे असे त्यांनी नमूद केले. जीएसटी, भूसंपादन असे महत्त्वाचे विधेयक सरकारने आणत असून गुंतवणूक, उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी करप्रणालीतही सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.