मोदी सरकार सैफ अली खानकडून पद्मश्री परत घेणार ?
By Admin | Updated: March 16, 2015 09:47 IST2015-03-16T09:43:32+5:302015-03-16T09:47:34+5:30
बॉलीवूडमधील अभिनेता सैफ अली खानचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्यासाठी मोदी सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत.

मोदी सरकार सैफ अली खानकडून पद्मश्री परत घेणार ?
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - बॉलीवूडमधील अभिनेता सैफ अली खानचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्यासाठी मोदी सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून अहवालही मागितल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.
अभिनेता सैफ अली खानने फेब्रुवारी २०१२ रोजी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरुन अनिवासी भारतीयाला मारहाण केली होती. या प्रकरणी मुंबईतील न्यायालयाने सैफवर आरोप निश्चित केले आहे. २०१० मध्ये सैफ अली खानला कला व मनोरंजन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीला अशा स्वरुपाचे पुरस्कार देता येत नसल्याने सैफला दिलेला पद्मश्रीचा पुरस्कार परत घ्यावा अशी मागणी केली जात होती. माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून यासंदर्भात आरटीआय अंतर्गत माहिती मागवली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने २० ऑगस्ट २०१४ मध्ये मुंबई पोलिसांना पत्र पाठवून सैफ अली खानप्रकरणात अहवाल मागवला होता. मात्र मुंबई पोलिसांनी अजून अहवाल सादर केला नसून या कामाला गति देण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना दिले आहेत असे उत्तर केंद्रीय गृहमंत्रालयाने अग्रवाल यांना दिले आहे. यामुळे सैफ अली खानचा पद्मश्री पुरस्कार परत जाण्याची चर्चा पुन्हा जोर धरु लागली आहे.