मिश्रांनी केजरीवालांच्या 400 कोटींच्या घोटाळ्याचे पुरावे केले सादर

By Admin | Updated: May 8, 2017 18:59 IST2017-05-08T17:38:31+5:302017-05-08T18:59:51+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभागा(ACB)ला केजरीवालांच्या 400 कोटींच्या टँकर घोटाळ्याचे पुरावे सुपूर्द केले आहेत.

Mishra gives evidence of Kejriwal's Rs 400 crore scam | मिश्रांनी केजरीवालांच्या 400 कोटींच्या घोटाळ्याचे पुरावे केले सादर

मिश्रांनी केजरीवालांच्या 400 कोटींच्या घोटाळ्याचे पुरावे केले सादर

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - केजरीवाल सरकारमध्ये मंत्रिपदावरून हटवण्यात आलेले आम आदमी पार्टीचे आमदार कपिल मिश्रा यांनी आज दिल्लीतल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागा(ACB)ला केजरीवालांच्या 400 कोटींच्या टँकर घोटाळ्याचे पुरावे सुपूर्द केले आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्याच्या चौकशीला केजरीवाल जाणूनबुजून उशीर करत असल्याचा आरोपही मिश्रा यांनी केला आहे.

एसीबीकडे पुरावे दिल्यानंतर त्यांनी केजरीवाल कशा प्रकारे चौकशीसाठी टाळाटाळ करत आहेत, हेही अधिका-यांना सांगितलं आहे. मिश्रा यांनी दावा केला आहे की, मंत्री नसतानाही याची चौकशी करून त्याचा अहवाल केजरीवालांना सुपूर्द केला होता. त्यावेळी मी टँकर घोटाळ्यात दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या विरोधात एफआयआर दाखल करून चौकशी करण्याची शिफारस केली होती. मिश्रा म्हणाले, केजरीवाल आणि त्यांच्या दोन सहका-यांशी संबंधितही टँकर घोटाळ्यातसंदर्भात पुरावे दिले आहेत. या पुराव्यांवरून शीला दीक्षित यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचं स्पष्ट होत आहे.

एसीबी याची सखोल चौकशी करण्यासाठी मला पुन्हा बोलावणार आहे, असंही मिश्रा म्हणाले आहेत. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सहकारी मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोपावर ठाम असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तसेच त्यांनी लाय डिटेक्टर टेस्ट करण्याचीही मागणी केली आहे. 
(केजरीवालांनी माझं स्वप्न भंग केलं- अण्णा)
तत्पूर्वी अण्णांनीही केजरीवालांवर नाराजी व्यक्त केली होती. केजरीवाल सरकारनं माझं स्वप्न आधीच भंग केलं आहे. या प्रकरणावर पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल किरण बेदी यांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. टाइम्स नाऊला अण्णा म्हणाले, मी पूर्ण प्रकरणाचा अभ्यास करेन आणि मगच त्यावर विस्तारानं चर्चा करेन, आता मी जे टीव्हीवर पाहतो आहे. त्या बातम्या पाहून मला खूप दुःख होतंय, आम्ही भ्रष्टाचाराविरोधात एकत्र लढतो आहोत. मी गेल्या 40 वर्षांपासून भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतो आहे. दिल्लीत जी भ्रष्टाचार विरोधात लढाई झाली त्यामुळे केजरीवाल मुख्यमंत्री बनले. मात्र आज त्यांच्यावरच असे आरोप लागत असल्यानं ही खूपच दुःखदायक घटना आहे. मी आता त्याच्यावर काहीच बोलू शकत नाही. जेव्हा कॅबिनेटमधल्या 6 मंत्र्यांपैकी तिघांनी राजीनामा दिला, तेव्हाच माझं स्वप्न भंग झालं. कॅबिनेट मंत्री येऊन बोलतो की, मी केजरीवालांना दोन कोटी रुपये दिले. ही खूपच दुःखाची गोष्ट आहे.
 
किरण बेदी यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. ट्विट करत त्या म्हणाल्या, एका मुख्यमंत्र्यांविरोधत एक मंत्री भ्रष्टाचाराचे आरोप लावतो आहे. आणि साक्षीदार होण्याचा दावा करतो आहे. याची लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे. एकंदरीतच केजरीवालांच्या पुढच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत.

Web Title: Mishra gives evidence of Kejriwal's Rs 400 crore scam