सध्या जगभरात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे विधान केले आहे. "कोणत्याही मुद्द्याचे किंवा समस्येचे समाधान केवळ लष्करी कारवाईने होऊ शकत नाही," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी सुरू असलेल्या इराण-अमेरिका आणि रशिया-युक्रेन यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शांततेचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन केले. ते गुरुवारी दिल्लीत फिनलंडचे राष्ट्रपती अलेक्झांडर स्टब यांच्यासोबत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुत्सद्देगिरी आणि संवाद आवश्यक -पंतप्रधान म्हणाले, यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, नियम-कानून, संवाद आणि कूटनीति (डिप्लोमसी) हाच कोणत्याही संघर्षातून बाहेर पडण्याचा योग्य मार्ग आहे. आता जुन्या जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे आणि हे लवकरात लवकर होणे आवश्यक आहे.
भारत आणि युरोपचे संबंध आता 'सुवर्ण युगात' प्रवेश करत आहेत -दहशतवादासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, "दहशतवादाला त्याच्या सर्व स्वरूपात मुळापासून नष्ट करणे ही आपली सामायिक जबाबदारी आहे. जानेवारी महिन्यात युरोपियन युनियनसोबत झालेल्या ऐतिहासिक व्यापार कराराचा उल्लेख करत त्यांनी भारत आणि युरोपचे संबंध आता 'सुवर्ण युगात' प्रवेश करत असल्याचेही म्हटले आहे.
यावेळी, पंतप्रधानांनी फिनलंडसोबतची धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यावर भर दिला. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. अस्थिरतेच्या या काळात सैन्य नव्हे, तर शांतता आणि संवाद हाच भविष्याचा एकमेव मार्ग आहे, असेही मोदी यांनी म्हटले आहे.