खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 10:56 IST2026-04-12T10:54:17+5:302026-04-12T10:56:09+5:30
एका अंगणवाडी केंद्रात झालेल्या मोठ्या निष्काळजीपणामुळे पाच चिमुकल्यांचा जीव धोक्यात आला होता. अंगणवाडी सेविकेने ठेवलेलं उंदीर मारण्याचे औषध मुलांनी 'प्रसाद' समजून खाल्लं, त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडू लागली.

फोटो - tv9hindi
मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका अंगणवाडी केंद्रात झालेल्या मोठ्या निष्काळजीपणामुळे पाच चिमुकल्यांचा जीव धोक्यात आला होता. अंगणवाडी सेविकेने ठेवलेलं उंदीर मारण्याचे औषध मुलांनी 'प्रसाद' समजून खाल्लं, त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडू लागली. तातडीने या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ही घटना मोहगाव विकासखंडातील रमखिरिया ग्रामपंचायतीच्या छपरा टोला येथील अंगणवाडी केंद्रात घडली. अंगणवाडी सेविका ज्या घरात हे केंद्र चालवते, तिथे तिने कोपऱ्यात पिठात मिसळून उंदीर मारण्याचं औषध ठेवलं होतं. खेळता खेळता मुलांचं लक्ष त्याकडे गेले आणि त्यांनी ती खाण्याची वस्तू किंवा 'प्रसाद' समजून खाल्लं. औषध खाताच मुलांना उलट्या सुरू झाल्या आणि त्यांची प्रकृती गंभीर होऊ लागली.
मुलांची अवस्था बिघडताना पाहून पालक आणि केंद्रातील लोकांची चांगलीच धांदल उडाली. घाईघाईत पाचही मुलांना मोहगाव सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तत्परता दाखवत मुलांवर प्राथमिक उपचार सुरू केले. विषाचा परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर, अधिक चांगल्या उपचारांसाठी मुलांना तातडीने जिल्हा रुग्णालय मंडला येथे पाठवण्यात आले.
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आता सर्व मुलांची प्रकृती स्थिर आहे. मात्र खबरदारी म्हणून प्रशासनाने मुलांना २४ तास रुग्णालयात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेने महिला व बालविकास विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अंगणवाडीसारख्या संवेदनशील ठिकाणी विषारी औषध अशा प्रकारे उघड्यावर कसे ठेवले गेले? मुलांच्या आरोग्याशी झालेली ही मोठी चूक अत्यंत गंभीर मानली जात आहे.
आजारी पडलेल्या पाच मुलांमध्ये सचिन (३ वर्षे), समर (९ वर्षे), शिवन्या (३ वर्षे), कृतिका (५ वर्षे) आणि दीप्ती (दीड वर्ष) यांचा समावेश आहे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन एसडीएम (SDM) सचिन जैन यांनी चौकशीसाठी पथक स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. अहवाल आल्यानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, अंगणवाडी केंद्रांमध्ये उंदीर मारण्यासाठी विषारी औषधे ठेवण्यावर बंदी घालून त्याऐवजी सुरक्षित पिंजऱ्यांचा वापर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये.