श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) गेल्या काही दिवसांपासून हत्यासत्र सुरू आहे. गेल्या सात दिवसांत दहशतवाद्यांनी सात नागरिकांची गोळ्या घालून हत्या केल्यामुळे काश्मीरमधील दहशतीचे सावट गडद झाले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये समाजविघातक घटकांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. (900 over ground workers of let trf held in kashmir after attacks on minority civilians)
जम्मू-काश्मीर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत लष्कर-ए-तैयबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेएम), अल-बद्र आणि द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) च्या 900 हून अधिक ओव्हर ग्राउंड लोकांना (ओजीडब्ल्यू) ताब्यात घेतले आहे.
सूत्रांनी सीएनएन न्यूज 18 ला दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अल्पसंख्याक नागरिकांवर हल्ला केल्यानंतर ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. विविध तपास यंत्रणांकडून या ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व लोकांची संयुक्त चौकशी सुरू आहे.
सुत्रांचे म्हणणे आहे की, तपास यंत्रणा अटक केलेल्या ओव्हर-ग्राऊंड लोकांना विचारण्याचा प्रयत्न करीत आहेत की, हे सर्व जम्मू-काश्मीरमधील अल्पसंख्याक समुदायालाच का लक्ष्य करत आहेत. दरम्यान, खोऱ्यातील काश्मिरी पंडित व्यापारी माखन लाल बिंदरू आणि इतर दोन नागरिकांच्या मृत्यूची जबाबदारी टीआरएफ प्रमुखने घेतली आहे.
अलीकडेच, जम्मू पोलिसांनी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात असे म्हटले होते की, दहशतवाद्यांनी बिंदरू मेडीकेटचे मालक बिंदरू(68) यांना त्यांच्या फार्मसीमध्ये असताना लक्ष्य केले होते. यानंतर रात्री 8.30 च्या सुमारास दहशतवाद्यांनी लाल बाजार परिसरात गोलगप्पा विक्रेता वीरेंद्र पासवान याची हत्या केली.
वीरेंद्र पासवान हे बिहारमधील भागलपूरचे रहिवासी होते. यानंतर रात्री 8.45 च्या सुमारास दहशतवाद्यांनी बांदीपोराच्या शाहगुंड परिसरात एका सामान्य नागरिकाची हत्या केली. जम्मू -काश्मीर पोलिसांनी सांगितले की, मृताचे नाव मोहम्मद शफी लोणे असे असून तो नायदखाईचा रहिवासी आहे.