नवी दिल्ली - भारतीय जनता पक्ष पश्चिम बंगालमध्ये २०२१ साली होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कमळ फुलवण्यासाठी संपूर्ण ताकतीने प्रयत्न करत आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली जुगलबंदी अद्याप कायम आहे. भारतीय जनता पक्षाने एक पाऊल पुढे टाकत श्रीरामाच्या नाऱ्याला आता महाकालीच्या नाऱ्यांची जोड दिली आहे. यावरून ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपला टोला लगावला आहे.
सध्या ममता बॅनर्जी मुस्लीम समुदायाला आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुस्लिमांनी कुणालाही घाबरण्याची गरज नसल्याचे त्या वारंवार सांगत आहेत. त्यातच भाजपकडून जय श्रीरामच्या नाऱ्यांसोबत महाकालीच्या घोषणा भाजपकडून देण्यात येत आहे. त्यावरून तृणमूलने भाजपला टोला लगावला आहे. अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, काही लोकांनी मला सांगितले की, दिलीप घोष यांनी जय श्रीरामसोबत जय महाकालीच्या घोषणा देण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे ममता बॅनर्जी तिथे होत्या. तसेच रामाची टीआरपी घटली असून महाकालीची टीआरपी वाढल्याचे अभिषेक यांनी म्हटले.
बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळवल्यानंतर भाजपचे बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटले की, आता राज्यात आपले नारे जय श्रीराम आणि जय महाकाली असतील. बंगाल महाकालीची धरती असून आपल्याला महाकालीचा आशीर्वाद हवा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान टीएमसी प्रमुख ममता यांनी ईद निमित्त म्हटले की, त्यागाचे नाव हिंदू, इमानदारी म्हणजे मुस्लीम, प्रेमाचे प्रतीक ख्रिश्चन आणि बलिदानाचे नाव शिख असून यातून आपला हिंदुस्तान तयार झाला आहे. या हिंदुस्तानाची रक्षा आपल्याला करायची आहे. जो हमसे टकराएगा वो चूर-चूर हो जायेगा, हीच तृणमूलची घोषणा असल्याचे ममता यांनी सांगितले.