LPG Cylinder Crisis: इराण आणि अमेरिका, इस्रायलमधील वाढत्या तणावाचा थेट फटका आता तुमच्या स्वयंपाकघराला बसण्याची शक्यता आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीतून होणारी गॅसची वाहतूक ठप्प झाल्यामुळे देशातील एलपीजीचा साठा झपाट्याने संपत चालला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारी गॅस कंपन्या आता १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरमध्ये केवळ १० किलो किंवा ७ किलो गॅस भरून पुरवठा करण्याचा विचार करत आहेत.
भारताला लागणाऱ्या एकूण एलपीजीपैकी ६० टक्के गॅस आयात केला जातो. यातील ९० टक्के पुरवठा आखाती देशांमधून होतो. मात्र, इराणने होर्मुजची सामुद्रधुनी शत्रू राष्ट्रांसाठी बंद केल्याने गेल्या आठवड्यात फक्त दोन गॅसवाहू जहाजे भारतात पोहोचू शकली आहेत. ही जहाजे केवळ एक दिवसाचा देशाचा कोटा पूर्ण करू शकतात. सध्या भारताचे सहा मोठे टँकर्स पर्शियन गल्फमध्ये अडकून पडले आहेत.
कंपन्यांचा नवा प्लॅन काय?
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, उपलब्ध साठा जास्तीत जास्त घरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तेल कंपन्या सिलेंडरमधील गॅसचे वजन कमी करण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे १४.२ किलोच्या जागी १० किलो किंवा ७ किलोचा रिफिल दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच या सिलेंडरवर नवीन वजनाचे स्टिकर्स लावले जातील आणि ग्राहकांकडून कमी झालेल्या वजनानुसारच पैसे आकारले जातील. सध्या दोन सिलेंडरच्या बुकिंगमध्ये २५ दिवसांचे अंतर असते, ते आता ३० दिवसांपर्यंत वाढवले जाण्याची शक्यता आहे. "पुरवठा साखळी अत्यंत चिंता आहे. गॅसची बचत करणे ही काळाची गरज आहे, तरीही आम्ही घरगुती पुरवठा नियमित ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत," असे पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले.
सामान्यांच्या चिंतेत भर
या निर्णयामुळे गृहिणींचे बजेट आणि गणित दोन्ही कोलमडणार आहे. "आमच्या घरी १४ किलोचा सिलेंडर १५ दिवस चालतो. जर १० किलो गॅस मिळाला तर तो ७-८ दिवसांत संपेल. जर बुकिंगमधील अंतर २५-३० दिवस असेल, तर उरलेले २० दिवस स्वयंपाक कसा करायचा?" असा सवाल आता ग्राहकांकडून केला जात आहे.
वितरकांसमोर तांत्रिक पेच
एलपीजी पुरवणाऱ्यांच्या मते, सिलेंडरचे वजन बदलल्यास बॉटलिंग प्लांटमध्ये यंत्रणा पुन्हा सेट करावी लागेल. तसेच, ग्राहकांना कमी गॅस दिल्यास गॅस चोरीचे आरोप होण्याची भीती वितरकांनी व्यक्त केली आहे. त्यातच ई-केवायसी आणि तांत्रिक अडचणींमुळे आधीच ताण आहे.
ट्रम्प यांची इराणला तंबी अन् युद्धाचा भडका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला असून होर्मुजची सामुद्रधुनी खुली न केल्यास इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करण्याची धमकी दिली आहे. प्रत्युत्तरात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी हा मार्ग पूर्णपणे बंद करण्याचा इशारा दिला आहे. या जागतिक वादात भारताची मात्र मोठी कोंडी झाली आहे.