मला हिरो व्हायचं नाही, मी तर व्हीलन; असदुद्दीन ओवैसींची Exclusive मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 06:59 PM2019-12-16T18:59:23+5:302019-12-16T19:18:36+5:30

पूर्वी काँग्रेस आणि आता भाजपही मुस्लिमांकडे कायम राजकीय दृष्टिकोनातून बघत आले आहे.

Lokmat National Conclave: I do not want to be a hero, I am a villain; says Asaduddin Owaisi | मला हिरो व्हायचं नाही, मी तर व्हीलन; असदुद्दीन ओवैसींची Exclusive मुलाखत

मला हिरो व्हायचं नाही, मी तर व्हीलन; असदुद्दीन ओवैसींची Exclusive मुलाखत

googlenewsNext
ठळक मुद्देमाझा लढा फक्त मुस्लीमांसाठी नाही. मी लढतोय देशातील २३ टक्के अल्पसंख्यांकांसाठी - ओवैसीमहाराष्ट्रात सर्व पक्षांनी मुस्लीमांची मते घेतली आणि प्रत्यक्षात 'महाआघाडी'चे सरकार स्थापन झाले.लोकांना नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातून देशाचा हिरो ठरवायचा आहे. मी तर व्हीलन आहेच.

'मला मुस्लिमांचा नेता व्हायचे नाही आणि माझा लढाही फक्त मुस्लीमांसाठी नाही. मी लढतोय देशातील २३ टक्के अल्पसंख्यांकांसाठी. आपल्या अधिकारांपासून वंचित असलेल्या गरिबांसाठी आणि पदोपदी अन्याय सहन करणाऱ्या दुर्बलांसाठी माझा संघर्ष आहे,' अशी भूमिका एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी 'लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह' मध्ये सीएनएन न्यूज 18 चे व्यवस्थापकीय संपादक किशोर अजवानी यांना दिलेल्या मुलाखतीत मांडली.

जनपथ येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या भीम हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमात पत्रकार किशोर अजवानी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. हिंदू किंवा भाजपच्या मतदारांनी आपल्याला मते का द्यावी, या प्रश्नावर ओवैसी म्हणाले, 'भाजपचे मतदार ठरलेले आहेत. राहिला प्रश्न मतांचा तर आम्हाला सर्व धर्मांतील लोकांनी मते दिली आहेत. औरंगाबाद महानगरपालिकेत आमच्या पक्षाचे २७ नगरसेवक आहेत. त्यातील ६ मुस्लीमेतर आहेत. आमच्या पक्षातील लोकप्रतिनिधींकडे गर्दी करणाऱ्यांमध्ये प्रत्येक समाजातील, धर्मातील आणि सर्व घटकांतील लोक आहेत. माझ्या हैदराबादमधील कार्यालयात कधीतरी येऊन बघा. मी फक्त मुस्लिमांसाठी लढतोय, असे कुणालाही वाटणार नाही.' 'माझ्या निवडणूक लढविण्याचे खरे तर सर्वांनी स्वागत करायला हवे. पण, माझ्यावर आरोप होतो भाजपची 'बी टीम' म्हणून काम करण्याचा. ३० वर्षांपासूनच्या सेनेच्या खासदाराला आमच्या माणसाने पराभूत केले आहे. कुठून आली बी टीम?,' असा उलट सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रात सर्व पक्षांनी मुस्लीमांची मते घेतली आणि प्रत्यक्षात 'महाआघाडी'चे सरकार स्थापन झाले. दुर्दैवाने पूर्वी काँग्रेस आणि आता भाजपही मुस्लिमांकडे कायम राजकीय दृष्टिकोनातून बघत आले आहे. आणि दुसरीकडे या देशात मुस्लीम समाजाला व्हीलन बनवून ठेवले आहे, अशी खंतही त्यांनी मांडली.

उद्या रजनीकांत म्हणतील

भाजप-सेना म्हणतात मी देशविरोधी आहे आणि काँग्रेसचे लोक म्हणतात मी मतं फोडतोय. उद्या भाजपसोबत गेलो तर रजनीकांत म्हणतील आणि कॉंग्रेससोबत गेलो तर अमिताभ बच्चन म्हणतील, अशी कोटी त्यांनी केली.

युवकांनी राजकारणात यावे

'देशातील तरुणांनी जास्तीत जास्त प्रमाणात सक्रिय राजकारणात येण्याची गरज आहे. पण, उलट युवकांचा मतदानाचा टक्काच कमी होत चालला आहे. हे चित्र दुर्दैवी आहे. तरुणांनी विविध राजकीय पक्षांमध्ये सहभागी होऊन निवडणुका लढवायला पाहिजे,' असे आवाहन त्यांनी उपस्थित तरुणांना केले.

एनआरसी संविधानविरोधी

'भाजप नागरिकत्व सुधारणा विधेयक (कॅब) आणून संविधानविरोधी, आंबेडकरविरोधी, गांधीविरोधी, राजेंद्रप्रसादविरोधी आणि स्वातंत्र्यसेनानीविरोधी काम करीत आहे. संविधानाच्या निर्मितीच्या वेळी ईश्वराचा उल्लेख करण्याचा विचार मांडण्यात आला. पण, राजेंद्र प्रसाद यांनी त्याला विरोध केला आणि नागरिकांना महत्त्व देण्यात आले. आज भाजप धर्माच्याच नावावर नागरिकत्वाला महत्त्व देत आहे,' अशी टीका ओवैसी यांनी केली.

'कॅब'च्या नावावर भाजप देशाचे धार्मिक विभाजन करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे त्यांना सत्तेपासून दूर करायला हवे. हा कायदा तयार करून तर जिनांना जिवंत करण्याचाच प्रकार भाजपकडून होत आहे, अशी टीका त्यांनी केली.

किती लोकांना नागरिकत्व देणार?

'कॅब'च्या मुद्यावर मी सभागृहात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सरकारने दिली नाहीत. मी म्हणतो किती लोकांना नागरिकत्व देणार आहात, याची आकडेवारी द्या. पण अमित शहा एकाच श्वासात 'हजारो, लाखो' एवढेच सांगतात. पण नेमकी आकडेवारी देत नाहीत, अशी हरकत त्यांनी नोंदवली.

> शांत बसणार नाही

संविधानाने संसदेत आपले मत मांडण्याचा अधिकार दिला आहे. सरकार ऐकत नसेल तर लोकांमध्ये जाण्याचा आणि न्यायालयात जाण्याचाही अधिकार आहे.'कॅब'च्या विरोधात मी शांत बसणार नाही. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन लोकांना सांगेन आणि गरज पडलीच तर प्रत्येक घराचा दरवाजा ठोठावेन, असेही ओवैसी म्हणाले.

> राममंदिरामुळे भाजप येथवर

'राममंदिर बनविण्याची यात्रा विश्व हिंदू परिषदेने सुरू केली. अयोध्या प्रकरण झाले. पुढे गुजरातची दंगल झाली. २०१० पासून काँग्रेसची भाजपला मदत झाली. भाजप येथवर पोहोचले ते राममंदिरामुळेच,' याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

> मला हिरो व्हायचे नाही

'लोकांना नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातून देशाचा हिरो ठरवायचा आहे. मी तर व्हीलन आहेच. कारण मी मोदी आणि गांधी यांच्याविरोधात बोलत असतो. मला ५६ इंचाची छातीही दाखवायची नाही आणि हिरोही व्हायचे नाही,' असे त्यांनी स्पष्ट केले.

मी कट्टर कसा?

मी कधीही फक्त मुस्लीमांसाठी बोलत नाही. उपेक्षितांसाठी बोलतो. तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्याबाबतीत अशी अडचण आहे की, त्या म्हणतात तुम्ही कोण, आम्हीच इथले नेते. असे आहे तर पश्चिम बंगालच्या मुस्लीमांसाठी ममता बॅनर्जींनी काय केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

टीका करण्याचा अधिकार संविधानामुळे

नरेंद्र मोदी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे सगळेच वाईट आहेत, तर चांगले कोण, असा प्रश्न एका विद्यार्थ्याने विचारला. त्यावर ओवैसी म्हणाले, 'या सर्वांवर टीका करण्याचा अधिकार मला संविधानाने दिला आहे. त्यामुळे यांच्याबद्दल माझी मते मी जाहीरपणे मांडू शकतो.'

शब्दांकन : नितीन नायगांवकर

Web Title: Lokmat National Conclave: I do not want to be a hero, I am a villain; says Asaduddin Owaisi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.