मेडिकलच्या विद्यार्थ्यानं मृत्यूनंतर 4 जणांना दिलं जीवनदान
By Admin | Updated: July 4, 2017 13:45 IST2017-07-04T13:43:38+5:302017-07-04T13:45:24+5:30
इंदुरमधील एका 20 वर्षीय मेडिकल विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे अवयव दान करुन 4 जणांना जीवनदान दिले आहे.

मेडिकलच्या विद्यार्थ्यानं मृत्यूनंतर 4 जणांना दिलं जीवनदान
>ऑनलाइन लोकमत
इंदुर, दि. 4 - रस्ते अपघातात गंभीर स्वरुपात जखमी झालेल्या 20 वर्षीय मेडिकल विद्यार्थ्याचं उपचारादरम्यान ब्रेन डेड झाल्यानं त्याचा मृत्यू झाला. प्रियांक गुप्ता असे या मृत पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रियांकनं या जगाचा कायमचा निरोप जरी घेतला असला तरीही जाण्यापूर्वी तो चार जणांना जीवनदान देऊन गेला आहे.
अवयव दान करण्यासाठी प्रोत्साहन देणारी स्वयंसेवी संस्था "मुस्कान"चे कार्यकर्ते संदीपन आर्य यांनी सांगितले की, 26 जूनच्या रात्री झालेल्या भीषण रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रियांक गुप्ताला एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून हॉस्पिटलमधील डॉक्टर त्याची सर्व प्रकारे योग्य ती काळजी घेत होते. मात्र अखेर 3 जुलैला प्रियांकला ब्रेन डेड घोषित करण्यात आले.
संदीपन आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांक मूळचा मध्य प्रदेशातील दमोह येथील रहिवासी होता. इंदुरमधील एका खासगी मेडिकल कॉलेजमध्ये तो एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. पण रस्ते अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर प्रियांकच्या कुटुंबीयांना अवयव दानाची माहिती देण्यात आली. दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही कुटुंबीयांनी प्रियांकचे अवयव दान करण्यासाठी तयारी दर्शवली.
आर्य यांनी सांगितले की, सोमवारी (3 जुलै) रात्री प्रियांकचे हृदय एअर अॅम्ब्युलन्सनं दिल्लीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात आले तर इंदुरमधील वेगवेगळ्या हॉस्पिटलमधील तीन रुग्णांच्या शरीरात त्याचे यकृत आणि दोन्ही किडनी यांचे प्रत्यारोपण करण्यात आले. प्रियांकचे दोन्ही डोळे आणि त्वचा वेगवेगळ्या संस्थांना देण्यात आले असून याद्वारे आणखी दोन जणांना नवीन आयुष्य मिळू शकणार आहे.
आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदुरमध्ये गेल्या 20 महिन्यात ब्रेन डेड झालेल्या 21 जणांचे अवयव दान करण्यात आले आहेत. यात हृदय, यकृत, किडनी, डोळे आणि त्वचा यांच्या प्रत्यारोपणानं इंदुरसहीत दिल्ली, हरियाणा आणि मुंबईतील जवळपास 120 रुग्णांना नवं आयुष्य मिळालं आहे.