हरयाणामध्ये जनजीवन पूर्वपदावर येतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2016 11:02 IST2016-02-22T10:58:58+5:302016-02-22T11:02:35+5:30
जाट समाजाने पुकारलेल्या आंदोलनानंतर मागच्या दोन दिवसांपासून हिंसाचारामध्ये जळत असलेल्या हरयाणामध्ये जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

हरयाणामध्ये जनजीवन पूर्वपदावर येतेय
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - ओबीसी कोटयातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी जाट समाजाने पुकारलेल्या आंदोलनानंतर मागच्या दोन दिवसांपासून हिंसाचारामध्ये जळत असलेल्या हरयाणामध्ये जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
जाट समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा विचार करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केल्यानंतर जाट समाजाने आपले आंदोलन मागे घेतले. दिल्लीला लागून असलेल्या हरयाणाच्या बहुतेक सीमा वाहतूकीसाठी खुल्या झाल्या आहेत असे पोलिसांनी सांगितले.
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे पूर्वपदावर आलेली नाही. रेल्वे सेवा सोमवारीही पूर्णपणे पूर्ववत होणार नाही. रेल्वेने काही गाडया रद्द केल्या आहेत. दिल्लीला पाणीपुरवठा करणा-या मुनाक कालव्याचा सुरक्षपथकांनी सोमवारी पूर्णपणे ताबा मिळवला.
रात्री उशिरापर्यंत दिल्लीचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. सीआरपीएफच्या सहा आणि लष्कराच्या दोन तुकडया पहाटे चार वाजता सोनीपतमधील मुनाक कालव्यावर पोहोचल्या आणि दुरुस्ती काम सुरु केले.