डाव्यांच्या बंदने जनजीवन ठप्प
By Admin | Updated: March 15, 2015 01:49 IST2015-03-15T01:49:41+5:302015-03-15T01:49:41+5:30
राज्यातील माकपप्रणीत विरोधी डाव्या लोकशाही आघाडीने पुकारलेल्या बंदमुळे शनिवारी राज्यातील जनजीवन ठप्प झाले होते.

डाव्यांच्या बंदने जनजीवन ठप्प
तिरुवअनंतपूरम : केरळ विधानसभेत शुक्रवारी अर्थसंकल्प सादरीकरणाच्या वेळी झालेल्या हिंसक गदारोळाच्या निषेधार्थ राज्यातील माकपप्रणीत विरोधी डाव्या लोकशाही आघाडीने पुकारलेल्या बंदमुळे शनिवारी राज्यातील जनजीवन ठप्प झाले होते. बंददरम्यान काही भागात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेकीच्या किरकोळ घटना घडल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिरुवअनंतपुरम आणि कोल्लममध्ये दगडफेकीच्या घटनांनंतर बस वाहतूक बंद करण्यात आली. या दगडफेकीत एका बसचालकाच्या डोळ्याला जखम झाली. राजधानीत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना पोलीस संरक्षणात रुग्णालयात पोहोचविण्यात आले. कोझीकोड येथून प्राप्त वृत्तानुसार चेवयूरमध्ये एक ट्रक आणि विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या टूरिस्ट बसवरही दगडफेक करण्यात आली.
विरोधी आघाडीने स्वत:च्या आणखी एका अपयशावर पडदा घालण्यासाठीच संपाचे शस्त्र वापरल्याचा आरोप राज्याचे मुख्यमंत्री ओमान चांडी यांनी केला आहे. तर माकपचे प्रदेश सरचिटणीस कोडियारी बालाकृष्णन यांनी संप यशस्वी केल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत.
भ्रष्टाचाराचे कथित आरोप असलेले केरळचे अर्थमंत्री के.एम. मणी यांना अर्थसंकल्प सादर करण्यास विरोध करणाऱ्या विरोधकांनी विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ घातला होता. (वृत्तसंस्था)
४दरम्यान, केरळ विधानसभेत अभूतपूर्व गोंधळाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ) आणि माकपच्या नेतृत्वातील एलडीएफने सभागृहातील हिंसक धुडगुसासाठी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून कारवाईची मागणी केली.
४सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत बहुतांश आमदारांनी एलडीएफ सदस्यांवर कारवाईची मागणी उचलून धरली.