लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 05:30 IST2025-09-19T05:26:37+5:302025-09-19T05:30:31+5:30
कोणालाही ऑनलाइन पद्धतीने कोणाचेही मतदार यादीतून नाव वगळता येत नाही, प्रत्येकाला बाजू मांडण्याची देतो संधी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार हे मत चोरणाऱ्यांना पाठीशी घालत असून लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्यांना समर्थन देत असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी काँग्रेसच्या इंदिरा भवन मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला. मी लोकसभेतील विरोधी पक्षनेता असून खूप जबाबदारीने ही विधाने केली आहेत, असेही ते म्हणाले.
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
आकडेवारीचा काँग्रेस समर्थकांचा मतदान हक्क निवडणुकीआधी पद्धतशीरपणे हिरावून घेतला जात असल्याचा दावा करून त्यांनी त्यासाठी कर्नाटकातील आळंद विधानसभा मतदारसंघातील दाखला दिला. महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात ६,८५० जणांची नावे फसव्या पद्धतीने ऑटोमेटेड सॉफ्टवेअरद्वारे मतदारयादीत समाविष्ट करण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला.
आयोग म्हणते, ते शक्य नाही
सामान्य नागरिकाला ऑनलाइन पद्धतीने कोणाचेही नाव वगळता येत नाही. कोणत्याही व्यक्तीचे नाव मतदारयादीतून वगळण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली जाते. राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे व निराधार आहेत असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
देशाचे तरुण, देशाचे विद्यार्थी, देशातील झेन झी हे भारताच्या संविधानाचे रक्षण करतील, लोकशाहीचे रक्षण करतील आणि मतांची चोरी थांबवतील. मी नेहमीच त्यांच्यासोबत उभा आहे.
राहुल गांधी, विरोधी पक्षनेते
राहुल गांधी यांचे ४ मोठे दावे
कर्नाटकातील आळंद विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल ६,०१८ मतदारांना वगळण्याचा प्रयत्न करण्यात आला. गोदाबाईच्या लॉगिनचा वापर करून १२ जणांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. मतदारांची नावे यादीतून वगळण्यासाठी इतर राज्यांमधील मोबाइल क्रमांकाचा वापर करण्यात आला. कर्नाटक सीआयडीने आयोगाला १८ स्मरणपत्रे पाठवली, ही माहिती एक आठवड्यात आयोगाने द्यावी.
आळंदमध्ये कसे वगळले मतदार ?
कर्नाटकातील आळंदमध्ये काँग्रेसच्या मजबूत बुथमध्ये टार्गेट करून मते हटवली गेली. तेथील बूथ-लेव्हल ऑफिसरच्या काकांचे नाव यादीतून हटविले आणि त्यांच्या शेजारणीने हे कृत्य केल्याचे दाखवले.
शेजारणीकडे चौकशी केल्यावर आपल्याला याबद्दल काहीच माहिती नाही असे सांगितले. कुणी तरी बाहेरच्या व्यक्तीने विशिष्ट सॉफ्टवेअर वापरून, सिस्टिममध्ये हस्तक्षेप करून मतदाराचे नाव वगळले. हे गैरकृत्य करण्यासाठी वापरलेले मोबाइल क्रमांक कर्नाटकबाहेरचे आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.
आळंद मतदारसंघ, कर्नाटक : २०२३ मध्ये काँग्रेसचे बी. आर. पाटील विजयी राजुरा मतदारसंघ, महाराष्ट्र : २०२४ मध्ये भाजपचे देवराव भोंगळे विजयी राजुरातील 'त्या' मतदारांची ऑनलाइन नोंदणी वादात सर्वच नावे परप्रांतीय? पत्ते, मोबाइल क्रमांक चुकीचे.
अशाप्रकारे उघड झाला होता प्रकार : २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीत कोरपनाचे काँग्रेसचे नेते विजय बावणे यांनी मतदार याद्या तपासल्या असता अनेक नावे चुकीच्या पत्त्यांसह, बोगस मोबाइल क्रमांकांसह व भिंतीचे फोटो लावलेली आढळली. ही नावे प्रामुख्याने परप्रांतीय नागरिकांची आहेत.
राजुरातील त्या मतदारांची नोंदणी वादात
चंद्रपूर : राजुरा विधानसभा मतदारसंघात ६,८५० नव्या मतदारांची संशयास्पद नोंदणी झाल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राजुरातील या प्रकरणाकडे लक्ष वेधले. या नोंदणी विरोधात गुन्हाही दाखल आहे. मात्र, आयोगाकडून अपेक्षित माहिती न मिळाल्याने तपास ठप्प आहे.
आयोगाच्या ईआरओ या वेबसाइटवर संबंधित माहिती अपलोड केलेली आहे. मात्र, ही नोंदणी जिथून झाली, त्या संगणकांचा आयपी अॅड्रेस आम्ही मागवू शकत नाही.
ओमप्रकाश गोंड, तत्कालीन तहसीलदार, राजुरा