काश्मीरमधील हल्ल्यात लष्कर-ए-तय्यबाचा हात, TRFच्या माध्यमातून करतोय कारवाया
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 18:50 IST2021-10-07T18:49:58+5:302021-10-07T18:50:27+5:30
TRF लष्कर-ए-तैयबाच्या सहयोगी संघटनांपैकी एक आहे.

काश्मीरमधील हल्ल्यात लष्कर-ए-तय्यबाचा हात, TRFच्या माध्यमातून करतोय कारवाया
नवी दिल्ली:जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने होणाऱ्या नागरिकांच्या हत्यांमुळे 'द रेझिस्टन्स ग्रुप'(TRF) ही दहशतवादी संघटना प्रकाशझोतात आली आहे. काश्मिरी व्यापारी माखनलाल बिंद्रू आणि अन्य दोन नागरिकांच्या हत्येची जबाबदारी या संघटनेनं स्विकारली आहे.
68 वर्षीय बिंद्रू यांची मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. बिंद्रूंची त्याच्या फार्मसीमध्येच हत्या झाली. बिंद्रूंच्या हत्येच्या काही मिनिटांपूर्वी बिहारमधील स्थलांतरित वीरेंद्र पासवानचीही हत्या करण्यात आली. गरीब कुटुंबातील वीरेंद्र पाणीपुरी विकायचे. त्याचवेळी स्थानिक टॅक्सी स्टँडचे अध्यक्ष मोहम्मद सफी लोन यांचीही बांदीपोरा जिल्ह्यात हत्या झाली.
यानंतर गुरुवारी दहशतवाद्यांनी शाळेत घुसून दोन शिक्षकांची हत्या केली. ते दोघे शीख आणि हिंदू समाजाचे होते. दरम्यान, गेल्या आठवड्यातच काश्मीरमध्ये 7 नागरिकांचा बळी गेला आहे. यापैकी तीन हिंदू-शीख समाजातील होते. या वर्षी आतापर्यंत राजकीय कार्यकर्त्यांसह 25 नागरिक मारले गेले आहेत.
लष्कर-ए-तय्यबाची संघटना
दहशतवादी संघटना टीआरएफ ही पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तय्यबाची एक आघाडी मानली जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच टीआरएफचे ओव्हरग्राउंड कामगार पूर्णपणे मुख्य कॅडरमध्ये बदलले आहेत आणि लोकांना लक्ष्य करत आहेत.