बिहार विधानसभा निवडणुकीत राजदचा मोठा पराभव झाल्यानंतर पक्षांतर्गत राजकीय भूकंप झाला आहे. राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कन्या आणि माजी लोकसभा उमेदवार रोहिणी आचार्य यांनी शनिवारी राजकारण सोडण्याची आणि कुटुंबाशी संबंध तोडण्याची घोषणा केली. राबडी देवी यांच्या घरातून बाहेर पडताना त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, "माझे कोणी कुटुंब नाही. मला जबाबदारी घ्यायची नाही. चाणक्यला विचारा... संजय यादव, तेजस्वीला जाऊन विचारा. प्रश्न विचारल्यास शिवीगाळ करतील, चप्पलने मारतील." त्यांनी तेजस्वी यादव यांच्यावर कुटुंबातून बाहेर काढल्याचा आरोप केला आहे.
रोहिणी आचार्य यांनी आपल्या राजीनाम्यानंतर 'एक्स'वरही स्पष्ट शब्दांत लिहिले की, त्या राजकारणातून संन्यास घेत आहेत आणि कुटुंबाशी असलेले संबंध संपवत आहेत. त्यांनी दावा केला की, तेजस्वी यादव यांचे सल्लागार संजय यादव आणि एका रमीजने त्यांना असे करण्यास सांगितले होते. त्यांनी लिहिले, "मी राजकारण सोडत आहे आणि माझ्या कुटुंबाशी संबंध तोडत आहे. संजय यादव आणि रमीज यांना हेच हवे होते, आणि आता मी संपूर्ण दोष माझ्यावर घेत आहे."
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर वाढले अंतर
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या रोहिणी यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत सारण मतदारसंघातून राजदच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, परंतु त्यांचा भाजपच्या राजीव प्रताप रूडी यांच्याकडून पराभव झाला. तेव्हापासून त्यांचे कुटुंब आणि पक्षापासूनचे अंतर वाढल्याचे दिसून येत होते. निवडणुकीच्या कित्येक महिने आधीच त्यांनी 'एक्स'वर राजद, लालू यादव आणि भाऊ तेजस्वी यादव यांना अनफॉलो केले होते.
२०२२मध्ये किडनी दान करणे ठरले वादाचे मूळ
रिपोर्ट्सनुसार, या वादाचे मूळ २०२२मध्ये वडील लालू यादव यांना रोहिणी यांनी किडनी दान केली होती, त्यावर उपस्थित झालेले प्रश्न आणि त्यावरून होणारी टीका हे आहे. रोहिणी यांनी या मुद्द्यावर अनेकदा सार्वजनिकरित्या नाराजी व्यक्त केली होती.
तेजस्वी यादव यांचे जवळचे आणि राज्यसभा खासदार संजय यादव यांची वाढती भूमिका हे देखील वादाचे मोठे कारण मानले जात आहे. 'बिहार अधिकार यात्रा' दरम्यान राजदच्या बसमध्ये संजय यादव पुढे बसलेले असतानाचा एक फोटो पाहून रोहिणी यांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर त्यांचा पक्षांतर्गत विरोध वाढला. रोहिणी यांना कुटुंबातूनही टीकेला सामोरे जावे लागले आणि त्यांच्या कथित राजकीय महत्त्वाकांक्षेवरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. या आरोपांना कंटाळून त्यांनी किडनी दानावर उपस्थित केलेले प्रश्न खोटे आणि दुर्भावनापूर्ण असल्याचे सांगत उघडपणे भूमिका मांडली होती.
तेज प्रताप यांचे निष्कासन आणि रोहिणीचा थेट पाठिंबा
दरम्यान, तेज प्रताप यादव यांना त्यांच्या नुकत्याच झालेल्या वादामुळे राजदमधून निष्कासित करण्यात आल्याने कुटुंबातील परिस्थिती अधिक अस्थिर झाली आहे. तेज प्रताप यांनी उघडपणे रोहिणीला समर्थन दिले होते आणि विरोधकांविरुद्ध सुदर्शन चक्राचा उल्लेख करत भावनिक संदेशही दिले होते.
संजय यादव यांच्यावर रोहिणींचा थेट हल्ला
रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांचे राजकीय सल्लागार संजय यादव यांच्यावर थेट हल्ला केला आहे. यापूर्वीही लालू कुटुंबातील अनेक सदस्यांनी संजय यादव यांच्यावर पक्षाच्या तिकीट वाटप आणि अंतर्गत निर्णयांमध्ये गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे. तेज प्रताप यांनी तर संजयला "जयचंद" असेही म्हटले होते आणि त्यांच्यापासून कुटुंबाचे अंतर वाढण्यास तोच जबाबदार असल्याचा दावा केला होता.
लालू कुटुंबातील 'गृहकलह' वाढला
काही महिन्यांपूर्वी लालू यादव यांनी तेज प्रताप यांना पक्षातून काढून टाकले होते, जेव्हा त्यांनी अनुष्का यादव यांच्यासोबतच्या संबंधांबद्दल सार्वजनिकरित्या बोलले होते. आता रोहिणी आचार्य यांनी कुटुंबापासून दूर राहण्याची घोषणा केल्याने हा वाद अधिकच वाढला आहे. लालू कुटुंबातील फूट वाढत असून, लोक याला गृहकलह म्हणू लागले आहेत. सध्याच्या घडामोडींनी राजदच्या अंतर्गत राजकारणाला पूर्णपणे हादरवून टाकले आहे.
Web Summary : Rohini Acharya, Lalu Yadav's daughter, announced severing ties with family and quitting politics after RJD's election defeat. She accused Tejashwi Yadav of ousting her, citing interference from Sanjay Yadav and a 'Ramiz'. Family disputes and political ambitions fueled the rift.
Web Summary : लालू यादव की बेटी रोहिणी आचार्य ने राजद की हार के बाद परिवार से नाता तोड़ा, राजनीति छोड़ी। उन्होंने तेजस्वी यादव पर निकालने का आरोप लगाया, संजय यादव और 'रमीज़' के हस्तक्षेप का हवाला दिया। पारिवारिक विवाद और राजनीतिक महत्वाकांक्षाएँ कलह का कारण बनीं।