पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘इसिस’
By Admin | Updated: July 4, 2015 03:59 IST2015-07-04T03:59:29+5:302015-07-04T03:59:29+5:30
कट्टर इस्लामी ‘खिलाफत’ स्थापन करण्याच्या वल्गना करीत क्रौर्य आणि धर्मवेड या जोरावर इराक आणि सीरियाच्या बऱ्याच मोठ्या भूप्रदेशावर कब्जा करून

पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘इसिस’
श्रीनगर : कट्टर इस्लामी ‘खिलाफत’ स्थापन करण्याच्या वल्गना करीत क्रौर्य आणि धर्मवेड या जोरावर इराक आणि सीरियाच्या बऱ्याच मोठ्या भूप्रदेशावर कब्जा करून जागतिक नेत्यांची झोप उडविलेली ‘इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया’ (इसिस) ही दहशतवादी संघटना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणजेच इसिस भारताच्या उंबरठ्यावर येऊ पाहात आहे, असे संकेत भारतीय लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी येथे दिले.
जम्मू-काश्मीर सीमेवर जागता पाहरा देण्याची जबाबदारी असलेल्या भारतीय लष्कराच्या १६व्या कॉर्प्सचे ध्वजाधिकारी लेफ्ट. जनरल के. एच. सिंग यांनी राजौरी जिल्ह्यात झांगर येथे लष्कराच्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी वार्ताहरांशी बोलताना हे संकेत दिले. ते म्हणाले, की आम्हाला ज्या काही गुप्तवार्ता मिळत आहेत त्यावरून ‘इसिस’ने अद्याप मोठ्या प्रमाणावर घुसखोरी केली नसली तरी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाय रोवण्याचा त्यांचा प्रयत्न नक्कीच सुरू असल्याचे दिसते. ‘इसिस’ने काश्मीर खोऱ्यात शिरकाव केल्याच्या पार्श्वभूमीवर पाकव्याप्त काश्मीरमध्ये या दहशतवादी संघटनेचा कितपत धोका संभवतो, या आशयाच्या प्रश्नास जनरल सिंग उत्तर देत होते. जनरल सिंग म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमध्ये अजून तरी ’इसिस’चा दखल घेण्याइतपत शिरकाव झाल्याचे दिसून आले नसले तरी सीमेपलिकडे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारी (पाक पुरस्कृत) प्रशिक्षण केंद्रे मात्र अबाधित आहेत. योग्य संधी मिळताच भारतात घुसखोरी करण्यासाठी पिर पांजाळ पर्वतराजीच्या पलिकडे २०० ते २५० दहशतवादी ३५ ठिकाणी दबा धरून बसले असल्याची माहिती लष्करास मिळाली आहे.
लष्कराने आयोजित केलल्या ‘झांगर दिन’ समारंभासाठी येथे आले होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर लगेचच सन १९४७-४८ मध्ये काश्मीरच्या राजौरी विभागात पाकिस्तानशी झालेल्या सशस्त्र संघर्षात लष्कराच्या १५ पॅराशूट डिव्हिजनने कमांडर ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांच्या नेतृत्वाखाली नौशेरा आघाडीवर अतुलनीय शौर्य दाखवून झांगर परत मिळविले होते. त्या लढाईत ब्रिगेडियर उस्मान यांना हौतात्म्य आले व त्यासाठी त्यांना मरणोत्तर महावीरचक्र देऊन गौरविण्यात आले. भारतीय लष्करात ब्रिगेडियर उस्मान आजही ‘नौशेर का शेर’ म्हणून ओळखले जातात व त्या लढाईच्या स्मृत्यर्थ ‘झांगर दिन’ साजरा केला जातो. लेफ्ट. जनरल सिंग यांनी या कार्यक्रमात स्मृतीस्तंभावर पुष्कचक्र वाहिले व शहीद जवानांच्या कुटुंबियाशीही संवाद साधला.