Kanwar Yatra Latest News: श्रावणाच्या पवित्र महिन्यात महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी गंगाजल घेऊन निघालेल्या कावड यात्रेकरूंच्या जत्थ्याला भरधाव कारने चिरडले. यात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. २३ जुलै रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, अनेक यात्रेकरून कारने उडवल्यानंतर महामार्गालगत असलेल्या खोल खड्ड्यांमध्ये जाऊन पडले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मध्य प्रदेशातील ग्वालियरमध्ये ही घटना घडली. कावड यात्रेकरू भदावन येथून गंगेचं पाणी घेऊन परत गावी निघाले होते. मध्य प्रदेशातील ग्वालियरमध्ये शीतला माता देवी मंदिराच्या परिसरातून यात्रेकरू महामार्गाच्या एका बाजूने चालले होते. त्याचवेळी भरधाव कार त्यांच्या जत्थ्यात घुसली.
आधी उडवले, नंतर चिरडले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार खूप वेगात होती. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती १३ भाविकांच्या जत्थ्यात घुसली. कारने आधी उडवले. उडून खाली पडलेल्या काही जणांना चिरडले. त्यात चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे.
कारचा वेग इतका होता की, भाविकांना उडवल्यानंतर कार उलटली आणि बाजूला जाऊन पडली. कारच्या धडकेमुळे काही भाविक महामार्गाच्या बाजूने असलेल्या खोल खड्ड्यात फेकले गेले होते. पोलिसांना याबद्दलची माहिती मिळाल्यानंतर तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये काही जण कारमधील प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गावापासून ३५ किमी अंतरावर असतानाच झाला अपघात
गंगेचं पाणी घेऊन येणारे १३ भाविक मध्य प्रदेशातील सीमरिया तालुक्यातील बंजरा का पुरा गावचे आहेत. गावापासून ३५ किमी अंतरावर असतानाच त्यांचा अपघात झाला. पुरन गिरवीर सिंह बंजारा, रमेश नरसिंग बंजारा, दिनेश बेताल सिंह बंजारा, धर्मेंद्र उर्फ छोटू असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. प्राथमिक तपासानुसार, कारचे टायर फुटले आणि त्यामुळे कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले, अशी माहिती देण्यात आली आहे.