जावडेकर ठरले डार्क हॉर्स

By Admin | Updated: May 27, 2014 05:19 IST2014-05-27T05:19:34+5:302014-05-27T05:19:34+5:30

नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांना ऐनवेळी धक्का देत सध्या संसदेच्या कोणत्याही सदनाचे सदस्य नसलेल्या प्रकाश जावडेकर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला.

Javdekar became the Dark Horse | जावडेकर ठरले डार्क हॉर्स

जावडेकर ठरले डार्क हॉर्स

यदु जोशी, नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांना ऐनवेळी धक्का देत सध्या संसदेच्या कोणत्याही सदनाचे सदस्य नसलेल्या प्रकाश जावडेकर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला. सगळ्या घटनाक्रमात जावडेकर डार्क हॉर्स ठरणे राज्यातील नेत्यांसाठीही अनपेक्षित होते. सकाळपर्यंत महाराष्ट्रातील भाजपाच्या सात जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असे मानले जात होते. चर्चेतील नावांपैकी हंसराज अहिर, दिलीप गांधी आणि हरिश्चंद्र चव्हाण यांचा अंतिमत: समावेश झाला नाही आणि जावडेकर सर्वांना धक्का देत पुढे निघून गेले. राज्यातील नेत्यांना विश्वासात घेऊनच मंत्रिमंडळातील नावे मोदींनी ठरविलेली होती. नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे हे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सुचविलेली रावसाहेब दानवे, पीयूष गोयल यांच्या नावावर त्यांनी शिक्कामोर्तब केले. गडकरी, मुंडेंचे नाव अर्थातच होते. मात्र, राज्यातील नेत्यांनी सुचविलेली गांधी, चव्हाण, अहिर ही नावे स्वीकारली नाहीत. उलटपक्षी जावडेकर यांचा समावेश करीत अंतिम शब्द आपलाच असेल, असा सूचक इशारा दिला. जावडेकर यांचा समावेश करीत असल्याचे त्यांनी सकाळी अन्य नेत्यांना सांगितले. जावडेकर यांची निवड आमच्यासाठी अनपेक्षित होते, असे एका नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले. रा.स्व. संघानेही त्यांच्या समावेशासाठी आग्रह धरला, असे समजते. मेहनतीचे बक्षीस पक्षाने काही दिले अन् न दिले तरी पक्ष कार्याप्रतीची निष्ठा कमी होऊ द्यायची नाही या विचाराने कार्यरत राहिल्याने जावडेकर यांना आज मंत्रिपदाचे बक्षीस मिळाले, असे म्हटले जाते. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर जावडेकर निराश झाले नाहीत. नंतर त्यांना ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांनी दिल्लीला नेले. पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठविले. पुढे ते पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपला तेव्हा पक्षाने त्यांच्याऐवजी आपल्या कोट्यातून रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांना राज्यसभेवर पाठविले. आठवलेंसाठी जावडेकरांचा बळी घेतला गेला, अशी टीकाही झाली. लोकसभा निवडणुकीत पक्षाने आपल्याला पुण्यातून उमेदवारी द्यावी, अशी त्यांची सुरुवातीला इच्छा होती पण पक्षनेतृत्वाचा कल लक्षात घेऊन ते पुन्हा दिल्लीत सक्रिय झाले. राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी समर्थपणे पेलत राहिले. सोबतच देशपातळीवर निवडणुकीच्या नियोजनात पक्षासाठी त्यांनी योगदान दिले. सीमांध्र आणि तेलंगणामध्ये तेलगू देसम पक्षाशी भाजपाची युती होण्यात त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली. ही युती तुटणार की काय, असा पेच निर्माण झाला होता; पण जावडेकर यांनी खुबीने तो टाळला. भाजपामध्ये ते नेहमीच लो प्रोफाईल राहिले. या सगळ्या बाबींचे बक्षीस त्यांना मंत्रिपदाच्या रूपाने मिळाले, असे आता म्हटले जात आहे.

Web Title: Javdekar became the Dark Horse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.