श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये इतर राज्यातील प्रवासी मजुरांवरील हल्ले वाढले आहेत. या महिन्यात अकरा बिगर काश्मीरी नागरिकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने प्रवासी मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यातच आता काश्मीर फ्रीडम फायटर्स आणि यूनायटेड लिबरेशन फ्रंट या दहशतवादी संघटनांनी बिगर काश्मीरी नागरिकांविरोधात धमकी देणारं पत्र जारी केलं आहे. तसेच, या संघटनांनी कुलगाम हत्याकांडाची जबाबदारीही स्वीकारली आहे.
रविवारी कुलगाम जिल्ह्यातील वानपोहमध्ये दहशतवाद्यांनी एका घरात घुसून बिहारमधील मजुरांची हत्या केली. त्यापूर्वी शनिवारीही बिहार आणि यूपीच्या दोन नागरिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जम्मू-काश्मीरमध्ये बिगर काश्मीरी नागरिकांवर वाढलेल्या हल्ल्यामुळे अनेकांनी राज्य सोडले आहे, तर बरेचजण राज्य सोडण्याच्या तयारीत आहेत. राजस्थानमधील एक स्थलांतरित व्यक्ती म्हणतो, इथली परिस्थिती बिकट होत आहे. आम्ही घाबरलो आहोत, आमच्याबरोबर मुले आहेत आणि म्हणून आम्ही आमच्या गावी परत जात आहोत.
कुलगाममधील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत काश्मीर फ्रीडम फायटर्सने म्हटले की, बिगर स्थानिक लोक भारतीय एजन्सींच्या संपर्कात होते. केंद्रीय एजन्सींना इशारा देताना संघटनेनं म्हटले की, जर काश्मीरमधील परिस्थिती बदलली नाही आणि बिगर स्थानिक लोक येथे स्थायिक झाले तर त्याचे परिणाम धोकादायक होतील. जम्मू-काश्मीरमधील सक्रिय दहशतवादी संघटना युनायटेड लिबरेशन फ्रंटकडूनही इशारा देण्यात आला आहे.