राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 07:39 IST2026-04-07T07:28:56+5:302026-04-07T07:39:33+5:30
करिअर घडविणे आणि देशासाठी काम करणे या परस्परविरोधी गोष्टी नाहीत, असेही ते म्हणाले

राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
कोची (केरळ): राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले. संघाशी संलग्न असलेल्या ‘बालगोकुलम’ या विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक संघटनेच्या दोनदिवसीय परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर ते एका सभेला संबोधित करीत होते. ते म्हणाले की, समृद्धी व सुरक्षा स्वतंत्रपणे मिळविता येत नाहीत. जेव्हा राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असते, तेव्हा कुटुंबेही समृद्ध आणि सुरक्षित होतात. जेव्हा एखादी व्यक्ती देशाची समृद्धी आणि सुरक्षेसाठी काम करते, तेव्हा ती स्वतः समृद्ध होते.
करिअर, देशासाठी काम...
तरुणांचा उल्लेख करीत भागवत म्हणाले की, वैयक्तिक करिअरवर लक्ष केंद्रित करावे की, देशाच्या विकासासाठी काम करावे, याबद्दल अनेकदा संभ्रम असतो. असा संभ्रम असायला नको. कारण करिअर घडविणे आणि देशासाठी काम करणे या परस्परविरोधी गोष्टी नाहीत. योग्य मार्ग निवडणे हेच सर्वांत महत्त्वाचे आहे.लोकांना नेहमीच राष्ट्रउभारणीसाठी योगदान देण्याची प्रेरणा दिली जाते, असे भागवत म्हणाले.