COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 13:34 IST2025-06-07T13:31:53+5:302025-06-07T13:34:51+5:30
Coronavirus In India: देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.

COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ५ हजारांचा टप्पा ओलांडला असून गेल्या २४ तासांत ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि कोरोना मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. पश्चिम बंगाल आणि केरळसह इतर काही राज्यांमध्ये मास्क घालण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यांसाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी करण्यात आली. कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये २० खाटांचा वॉर्ड राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. आरोग्य विभागाने म्हटले आहे की, "लोकांना घाबरण्याची गरज नाही. परंतु या धोकादायक आजाराबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे."
देशात सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये
देशात सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आढळली आहेत. राज्यातील रुग्णांची संख्या १ हजार ८०६ वर पोहोचली आहे. बकरी ईदच्या दिवशी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाने सामाजिक अंतर पाळण्याचे निर्देशही दिले. शिवाय, मास्क घालण्यावरही भर देण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.
महाराष्ट्रात आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू
महाराष्ट्रात आतापर्यंत १ हजार २७६ रुग्णांची नोंद झाली. राज्यात गेल्या २४ तासांत ११४ नवीन रुग्ण आढळले आहेत. चिंतेची बाब म्हणजे, राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत एकूण ५९२ सक्रीय रुग्ण आहेत. हरियाणा आणि तामिळनाडूमध्येही रुग्णांची संख्या वाढत आहे. हरियाणामध्ये कोरोनाचे ३१ नवीन रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडूतील रुग्णांची संख्या १९४ वर पोहोचली आहे.