दहशतवादी चकमकीत भारतीय जवान शहीद
By Admin | Updated: August 24, 2014 13:26 IST2014-08-24T13:26:57+5:302014-08-24T13:26:57+5:30
जम्मू काश्मीरमधील केरन सेक्टर येथे दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत भारताचा एक जवान शहीद झाला असून पाकिस्ताननेही सलग दुस-या दिवशी सीमा रेषेवरील २५ भारतीय चौक्यांसह १९ गावांवर गोळीबार केला आहे.

दहशतवादी चकमकीत भारतीय जवान शहीद
>ऑनलाइन लोकमत
कुपवाडा (जम्मू), दि. २४ - जम्मू काश्मीरमधील केरन सेक्टर येथे दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत भारताचा एक जवान शहीद झाला आहे. तर पाकिस्ताननेही सलग दुस-या दिवशी सीमा रेषेवरील २५ भारतीय चौक्यांसह १९ गावांवर गोळीबार केला आहे.
केरन सेक्टरमध्ये दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानमधून काही दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी केली होती. सुमारे ६ ते ८ दहशतवादी कारारुसच्या दिशेने जात असताना पेट्रोलिंग करणा-या भारतीय जवानांना या दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. रविवारी सकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला. या घटनेनंतर केरन सेक्टरमध्ये सुरक्षा दलाचे जवान रवाना झाले असून दहशतवाद्यांसोबत अजूनही चकमक सुरु असल्याचे समजते. याच भागात दोन दिवसांपूर्वी सैन्याने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.
दरम्यान, पाकिस्ताननेही सलग दुस-या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमारेषेवरील भारतीय चौक्या आणि गावांवर हल्ला केला. शनिवारी रात्रीपासून पाक सैन्याने जम्मूतील आर एस पुरा आणि अरनिया सेक्टर येथे गोळीबार केला. रविवारी सकाळी साडे सातपर्यंत पाककडून गोळीबार सुरु होता. भारताच्या सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाकला चोख प्रत्युत्तर दिले. पाकने स्वयंचलित बंदूक आणि मोर्टार बाँबचा या हल्ल्यात वापर केल्याचे बीएसएफच्या अधिका-यांनी सांगितले. सीमा रेषेवरील स्थितीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत चर्चा केली. गृहमंत्रींनी दिल्ली सोडून जाऊ नये असे मोदींनी सांगितल्यावर राजनाथ सिंह यांनी दिल्लीवगळता अन्य राज्यांमधील सर्व दौरे रद्द केले आहेत. राजनाथ सिंह यांनी बीएसएफच्या महासंचालकांसोबतही चर्चा केली असून पाकला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी बीएसएफच्या महासंचालकांना दिले आहेत.