जम्मू - पहलगाम हल्ल्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तानातील दहशतवादी तळांना टार्गेट केले. या हल्ल्याने बिथरलेल्या पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार, ड्रोन हल्ले सुरू आहेत. गुरुवारपासून भारतातील सीमाभागातील नागरी वस्त्यांवर पाकिस्तानने भ्याड हल्ले सुरू केलेत. या ड्रोन हल्ल्यामुळे नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याशिवाय हल्ल्यात काहीजण जखमी झाल्याचीही माहिती आहे. पाकिस्तानने जवळपास ३०० हून अधिक ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. हे सगळे हल्ले भारताच्या एअर डिफेन्स यंत्रणेने परतवून लावले.
जम्मू काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात पाकिस्तानने नागरी वस्त्यांवर हल्ले केले. या हल्ल्यातील पीडित जितेंद्र कुमार चड्डा यांनी म्हटलं की, सकाळी ५.४५ मिनिटांनी पाकिस्तानकडून हे हल्ले करण्यात आले. आम्ही घरात झोपलो होतो. त्यावेळी जोरदार आवाज आला. खिडक्यांच्या काचा फुटल्या. भ्याड हल्ला केला जातोय. तो मुस्लीम, हिंदू, शीख सगळ्यांवर होतो. आमच्या इथं ५ ते ६ जखमी झालेत. आमच्या घरांचे नुकसान झाले. वाहने जळाली असं त्यांनी सांगितले.
तर ४ वाजल्यापासून पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे. सकाळी ५.४५ वाजता मी माझ्या घराच्या पहिल्या मजल्यावर होतो तेव्हा मोठा स्फोटाचा आवाज झाला. ते ऐकून मी घाबरलो. ज्या घरावर ड्रोन हल्ला झाला तिथे देवीच्या कृपेने जीवितहानी झाली नाही. ३ जण जखमी आहेत. पाकिस्तानची आमच्या लष्कराशी थेट लढण्याची हिंमत नाही. त्यामुळे नागरी वस्तीत ते हल्ला करून शहरात दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा हेतू आहे. पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले जाईल. भारत पाकिस्तानच्या सैन्य तळांवर हल्ला करतोय परंतु ते आपल्याशी लढू शकत नाही म्हणून नागरी वस्तीवर हल्ला करत आहे असा आरोप जम्मू काश्मीरचे भाजपा आमदार अरविंद गुप्ता यांनी केला.
दरम्यान, सीमेवर पाकिस्तान लष्कराकडून उखळी तोफांचे हल्ले गावांवर केले जात असून, यात आता एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अतिरिक्त आयुक्त राज कुमार थापा यांचा पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती दिली. आपण जम्मू आणि काश्मीर प्रशासकीय सेवेतील एका अधिकाऱ्याला गमावले आहे. कालच माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते उपमुख्यमंत्र्यांसोबत हजर होते, असे अब्दुल्ला यांनी सांगितले.