ऑपरेशन सिंदूरनंतर चवताळलेल्या पाकिस्तानने आज पुन्हा एकदा भारतातील सीमेलगतच्या विविध शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. उत्तरेतील बारामुल्लापासून दक्षिणेला भूजपर्यंत जवळपास २६ ठिकाणी पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आले. मात्र हे हल्ले भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावले आहेत. पाकिस्ताने नागरी आणि लष्करी भागांना लक्ष्य करून हे हल्ले केले होते, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.
याबाबत भारतीय लष्कराकडून देण्यात आलेल्या अधिक माहितीनुसार बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपुरा, नागरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, फझिल्का, लालगड जट्टा, जैसलमेर, बाडमेर, भूज, कौरबेत आणि लाखी नाला, या ठिकाणांना आज पाकिस्तानने ड्रोनच्या माध्यमातून लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, फिरोजपूरमध्ये नागरी भागाला लक्ष्य करून करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यात एका स्थानिक कुटुंबातील काही सदस्य जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीय सुरक्षा दलांकडून परिस्थितीवर बारीक नजर ठेवण्यात आली आहे. तसेच हे हल्ले उधळण्यासाठी ड्रोन काऊंटर सिस्टिमचा उपयोग केला जात आहे. त्याबरोबरच आवश्यकता भासल्यास पाकिस्तानला त्याच भाषेत चोख प्रत्युत्तर दिलं जाणार आहे.
दरम्यान, सीमाभागात राहणाऱ्या नागरिकांनी घरातच थांबावे, गरज नसेल तर फिरू नये आणि स्थानिक प्रशासनाकडून सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या सूचनांचे सक्त पालन करावे, अशे आवाहन लष्कराकडून करण्यात आले आहे. तसेच सद्यस्थितीत घाबरून जाण्याची आवश्यकता नसली तरी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे सुरक्षा यंत्रणांकडून सांगण्यात आले आहे.