भारत आणि चीनमधील सीमारेषा ही जगातील सर्वात वादग्रस्त सीमांपैकी एक आहे. तसेच चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे या सीमेवर वारंवार वादही निर्माण होत असतात. पाच वर्षांपूर्वी गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये भीषण झटापट होऊन त्यात दोन्हीकडच्या सैनिकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोडा यांनी भारत आणि चीनमधील संबंधांबाबत एक धक्कादायक विधान केलं आहे. भारत आणि चीनमधील वाद अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने मांडला जातो, असा दावा त्यांनी केला आहे. भारताने या मुद्द्यावर नेहमीच आक्रमक भूमिका घेतलेली आहे. मात्र दोन्ही देशांनी आता सहकार्याच्या मार्गावरून पुढे गेलं पाहिजे. असा दावाही सॅम पित्रोडा यांनी केला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनपासून निर्माण होणाऱ्या धोक्याला रोखण्यात यशस्वी होतील का, असं विचारलं असता सॅम पित्रोडा म्हणाले की, चीनपासून काय घोका आहे, हे मला समजत नाही. अमेरिका नेही शत्रू निश्चित करण्याचं धोरण अवलंबतो. त्यामुळे भारत आणि चीनमधील वादाला नेहमी अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने मांडलं जातं.
पित्रोडा पुढे म्हणाले की, जगाने आता परस्पर संघर्ष सोडून सहकार्याच्या मार्गावर पुढे गेलं पाहिजे. आपलं धोरण हे सुरुवातीपासून संघर्षाचं राहिलं आहे. या भूमिकेमुळे देशात पाठिंबा तर मिळतो. मात्र त्यामुळे द्विराष्ट्रीय संबंधात कटूता निर्माण होते. आपण आपली मानसिकता बदलली पाहिजे. तसेच चीन सुरुवातीपासून आपला शत्रू आहे, हे समजणं बंद केलं पाहिजे. ही भूमिका केवळ चीनबाबत नाही तर सर्व देशांबाबत असली पाहिजे, असेही पित्रोडा यांनी पुढे सांगितले.