-एस. पी. सिन्हापाटणा : बिहारमधील विधान परिषदेच्या निवडणुकीत एनडीएची सरशी झाली आहे. एकूण २४ जागांपैकी २२ जागांचे निकाल हाती आले असून, एनडीएला १३ जागा मिळाल्या आहेत. यात जदयूला ५ व भाजपला ८ जागा मिळाल्या आहेत. राजदला ५ व अपक्षांनी तीन जागी बाजी मारली आहे. काँग्रेसने एका जागी विजय प्राप्त केला आहे. या निकालाने जदयू, भाजप प्रदेशाध्यक्षांसह अनेक बड्या बड्यांना धक्का दिला.
मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा पक्ष जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह हे आपल्या संसदीय मतदारसंघातून उमेदवाराला निवडून आणण्यात अपयशी ठरले. त्याचप्रमाणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय जायसवाल हेही आपल्या संसदीय मतदारसंघातून दोन्ही जागा निवडून आणण्यात अपयशी ठरले. याचबरोबर बिहार विधान परिषदेत राजदला विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक असलेले संख्याबळ मिळाले आहे. याचाच अर्थ राबडीदेवी यांचे विरोधी पक्षनेतेपद वाचले आहे, असा काढला जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेतून झालेल्या निवडणुकीत पाटणा जागेवर कार्तिक सिंह (१८८६ मते) यांनी अपक्ष कर्णवीर सिंह यादू ऊर्फ लल्लू मुखिया (१७०६) यांच्यावर मातकेली. जदयू उमेदवार वाल्मिकी सिंह (१३८८) तिसऱ्या स्थानावर राहिले. कटिहारमध्ये अशोक अग्रवाल (१७३८) यांनी दुसऱ्या फेरीत विजय मिळविला. राजदचे कुंदन यादव (९४२) व काँग्रेसचे सुनील यादव (८०१) यांचा त्यांनी पराभव केला.छपरामध्ये भाजपचा पराभव झाला. भाजपचे बंडखोर उमेदवार सच्चिदानंद राय यांनी पुन्हा विजय मिळविला.
कोणी, किती लढविल्या- एनडीएमध्ये भाजपने १२ व जदयूने ११ उमेदवार तसेच रालोजपाने एका जागेवर उमेदवार मैदानात उतरविले होते. राजद २३ व सीपीआयने एक जागा लढली होती.- यावेळी महागठबंधनपासून वेगळे होऊन काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविली होती. काँग्रेसने आठ जागी, मुकेश सहनी यांच्या विकासशील इन्सान पार्टीने (व्हीआयपी) सात तर चिराग पासवान यांच्या पक्षाने सहा जागांवर निवडणूक लढविली होती.- या निवडणुकीपूर्वी भाजपकडे सर्वाधिक १३ जागा होत्या. २०१६मध्ये भाजपने ११ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर दोन आमदार भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांची संख्या वाढून १३ झाली होती.- यावेळी भाजपने केवळ १२ जागा लढविल्या होत्या. पक्षाने आपल्या कोट्यातील मधुबनीची जागा जदयूला दिली होती. मागील वेळी जदयूकडे पाच जागा होत्या. परंतु नंतर राजदचे तीन आमदार जदयूमध्ये गेल्याने आमदारांची संख्या आठ झाली होती.