पाकिस्तानचे विचार दहशतवादासाठी पोषक - मोदींचे टीकास्त्र

By Admin | Updated: April 8, 2017 19:41 IST2017-04-08T18:31:03+5:302017-04-08T19:41:56+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा खडेबोल सुनावले आहेत

The idea of ​​Pakistan is a nuisance for terrorism - Modi's criticism | पाकिस्तानचे विचार दहशतवादासाठी पोषक - मोदींचे टीकास्त्र

पाकिस्तानचे विचार दहशतवादासाठी पोषक - मोदींचे टीकास्त्र

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  पाकिस्तानला पुन्हा एकदा खडेबोल सुनावले आहेत. आज बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या उपस्थितीत आयोजित 1971च्या बांंगलादेश युद्धातील हुतात्म्यांच्या कार्यक्रमात बोलताना मोदींनी  पाकिस्तानवर ही टीका केली. एकीकडे भारत आणि बांगलादेश विकासाच्या विचारासह पुढे जात आहेत. तर दक्षिण आशियात एक मानसिकता अशीही आहे जी दहशतवादासाठी प्रेरणा आणि पोषक ठरत आहे, अशी टीका मोदींनी पाकिस्तानचे नाव न घेता केली. 
मोदी म्हणाले, दक्षिण आशियात एक विचारधारा अशी आहे जी दहशतवादाला प्रेरक आणि पोषक ठरत आहे, ही दु:खद बाब आहे. हा एक असा विचार आहे, ज्याची मूल्य व्यवस्था मानवता नव्हे तर हिंसा आणि दहशत वादावर आधारलेली आहे. ज्याचा मूळ हेतू केवळ दहशतवाद पसरवणे हाच आहे.  या देशाला विकासापेक्षा विनाश मोठा वाटतो, तसेच विश्वासापेक्षा विश्वासघात मोठा वाटतो. हा विचार संपूर्ण दक्षिण आशियातील विकासात अडथळा आहे. भारत आणि बांगलादेश याचे साक्षीदार आहेत. 
यावेळी मोदींनी बांगलादेश युद्धातील हुतात्मा भारतीय सैनिक आणि मुक्तियोध्यांच्या बलिदानाची आठवण काढली. बांगलादेशाच्या जन्मासोबत एका नव्या आशेचा उदय झाला, असेही त्यांनी सांगितले. 
1971च्या युद्धात भारतीय सैनिकांनी मानवतेचे उदाहरण जगासमोर ठेवले. बंदी बनवण्यात आलेल्या 90 हजार पाकिस्तानी सैनिकांची भारताने मुक्तता केली. युद्धाच्या हिंसाचारातही भारतीय सैन्य आपल्या कर्तव्यापासून मागे हटले नाही. नियमांचे पालन करत जगासमोर एक वस्तुपाठ घालून दिला, असे मोदी म्हणाले. त्यांनी शेख मुजीबूर रेहमान यांच्या कार्याचा गौरव करताना ते  बांगलादेशच्या स्वातंत्र्याचे सूत्रधार होते, असे गौरवौदगार काढले.  

Web Title: The idea of ​​Pakistan is a nuisance for terrorism - Modi's criticism