राजा रघुवंशी आणि सौरभ राजपूत हत्याकांड सारख्या घटना समोर आल्यापासून अनेक पतींमध्ये भीती निर्माण झाली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये पत्नींनी त्यांच्या बॉयफ्रेंडसाठी पतीची हत्या केली. याच भीतीपोटी आता पती आपल्या पत्नीचं तिच्या बॉयफ्रेंडसोबत थेट लग्न लावून देत आहेत. उत्तर प्रदेशातील गोंडा येथे अशीच एक घटना समोर आली आहे. एका पतीने पत्नीचं लग्न तिच्या बॉयफ्रेंडशी लावून दिलं.
पतीने आरोप केला की, पत्नीने मला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. मी वाचलो हे माझं नशीब होतं. पण मला मरायचं नाही. म्हणूनच मी तिला मुक्त करत आहे. आता तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहावं. माझा याच्याशी काहीही संबंध नाही. ४० वर्षीय हरिश्चंद्रचं १५ वर्षांपूर्वी ३५ वर्षीय करिश्माशी लग्न झालं होतं. त्यांना दोन मुलं आहेत. मुलगा ११ वर्षांचा आहे आणि मुलगी ७ वर्षांची आहे. हरिश्चंद्र सूरतमध्ये काम करत होता.
एक वर्षापूर्वी करिश्माचे महाराजगंज येथील रहिवासी शिवराज चौहानशी प्रेमसंबंध सुरू झाले. शिवराज देखील सूरतमध्ये काम करतो. हरिश्चंद्रला याची माहिती आधीच मिळाली होती. हरिश्चंद्रने त्याची पत्नी करिश्मा आणि तिचा बॉयफ्रेंड शिवराज यांना रंगेहाथ पकडलं. त्यानंतर त्याने ठरवलं की, तो त्याची पत्नी करिश्माचं लग्न शिवराज चौहानशी लावून देईल. काही वेळातच गावातील लोक जमले.
हरिश्चंद्र करिश्मा आणि शिवराजला गावापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या अल्लीपूर येथील मंदिरात घेऊन गेला. तिथे त्याने सर्वात आधी पत्नी करिश्माचं स्वतः कुंकू पुसलं. त्यानंतर पत्नीचं लग्न लावून दिलं. या लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. गावात या अजब लग्नाची खूप चर्चा रंगली आहे.