पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतानेऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर पाकिस्ताननेभारतावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केल्यावर भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानमधील हवाई तळांवर हल्ला करत त्यांचं जबर नुकसान केलं होतं. दोन्ही देशांमध्ये टोकाचा संघर्ष सुरू झाला असतानाच १० मे रोजी संध्याकाळी अचानक युद्धविरामाची घोषणा झाली होती. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. एवढ्या लवकर आणि अचानक युद्धविराम कसा काय झाला, असा सवाल लोकांच्या मनात आला होता. दरम्यान, युद्धविरामाला २० दिवस पूर्ण झाल्यानंतर आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.
भारताचे चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी शनिवारी सिंगापूर येथील शांगरी-ला डायलॉगमध्ये याचं नेमकं कारण सांगितलं. ते म्हणाले की, भारताने आपल्या रणनीतीनुसार हे पाऊल उचललं आहे. भारताने तीन दिवसांमध्येच आपले सर्व लक्ष्य साध्य केले होते. त्यामुळे लष्करी कारवाई थांबवणे ही योग्य रणनीती होती.
सीडीएस जनरल अनिल चौहान पुढे म्हणाले की, भारताने या संपूर्ण मोहिमेदरम्यान, पूर्णपणे स्पष्टता आणि स्वायत्ततेसोबत काम केलं. त्यांनी सांगितलं की, भारताने १९४७ मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर दीर्घ धोरण अवलंबलं होतं. त्यावेळी पाकिस्तान प्रत्येक बाबतीत भारताच्या पुढे होता. मात्र आज भारत आर्थिक, सामाजिक आणि मानव विकासाच्या बाबतीत पाकिस्तानपेक्षा खूप पुढे गेला आहे. हा धोरणात्मकतेचाच परिणाम आहे.
जनरल चौधरी पुढे म्हणाले की, भारताने पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला होता. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवाज शरीफ यांना शपथविधीसाठी बोलावलं होतं. मात्र पाकिस्तानकडून बदल्यात केवळ शत्रुत्वच मिळालं. त्यामुळे आता पाकिस्तानपासून योग्य अंतर राखणं हेच योग्य धोरण ठरेल, असेही त्यांनी सांगितले.दरम्यान, शस्त्रसंधीनंतरही भारत सतर्क आहे. तसेच पाकिस्तानने पुन्हा काही आगळीक केली, तर कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल, असं लष्कराने स्पष्ट केलं आहे. ऑपरेशन सिंदूरने भारताची ताकद दाखवली आहे. तसेच दहशतवादाविरोधात भारत आता गप्प बसणार नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाकिस्ताननेही हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानने ७ ते १० मे दरम्यान, नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला होता. या गोळीबारात १५ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर एका जवानाला वीरमरण आले होते. त्यानंतर भारतानेही प्रत्युत्तरदाखल कारवाई केली होती. १० मे रोजी सकाळी भारतीय हवाई दलाने ब्राह्मोस क्षेपणास्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानमधील नूर खान-चकलाला विमानतळाला लक्ष्य केले होते. त्यात नूर खान-चकलाला विमानतळाचं जबर नुकसान झालं होतं. हा विमानतळ पाकिस्तानची राजधानी असलेल्या रावळपिंडीजवळ असल्याने या हल्ल्याने पाकिस्तानचे अवसान गळाले होते. तसेच त्यांनी युद्धविरामासाठी विनवणी सुरू केली होती. तसेच भारतानेही ही युद्धविरामाची विनवणी स्वीकार केली होती.