कायदेशीर लढाईसाठी टाटा सन्सकडून हरीश साळवे, अभिषेक मनू सिंघवीची टीम ?
By Admin | Updated: October 25, 2016 11:16 IST2016-10-25T10:44:29+5:302016-10-25T11:16:01+5:30
सायरस मिस्त्री यांना तडकाफडकी हटवल्यानंतर टाटा सन्सने प्रसिद्ध वकील हरीश साळवे आणि अभिषेक मनू सिंघवी यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कायदेशीर लढाईसाठी टाटा सन्सकडून हरीश साळवे, अभिषेक मनू सिंघवीची टीम ?
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - टाटा उद्योगसमूहाच्या चेअरमनपदावरुन सायरस मिस्त्री यांना तडकाफडकी हटवल्यानंतर टाटा सन्सने प्रसिद्ध वकील हरीश साळवे आणि अभिषेक मनू सिंघवी यांची नियुक्ती करण्याचे संकेत दिले आहेत. या निर्णयानंतर कायदेशीर अडचण उदभवू शकते याची टाटा सन्सला पूर्ण कल्पना असल्याने त्यांना हरीश साळवे आणि अभिषेक मनू सिंघवी यांच्याशी सल्लामसलत केली आहे अशी माहिती इकोनॉमिक्स टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने दिली.
मिस्त्रींना चेअरमनपदावरुन हटवण्यापूर्वी वकिलांचा कायदेशीर सल्ला घेतला होता असे सूत्रांनी इकोनॉमिक्स टाइम्सला सांगितले. या निर्णयाचे काय परिणाम होऊ शकतात यासंबंधी टाटा समूहाने सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश आर.व्ही.रवींद्रन आणि वरिष्ठ वकिल पी. चिंदबरम यांच्याशी चर्चा केली होती. अशा प्रकरणांमध्ये निर्णय घेण्याआधी मोठया कंपन्या नेहमी वकिलांचा सल्ला घेतात.
साळवे आणि सिंघवी यांच्याशिवाय टाटा सन्सची अन्य वकिलांबरोबरही चर्चा सुरु आहे. समूहाच्या संचालक मंडळाकडे चेअरमनला पदावरुन बर्खास्त करण्याचा अधिकार असतो असे कॉर्पोरेट वकिलांनी सांगितले. सायरस मिस्त्री यांचे वडिल शापूरजी-पालनजी यांचा टाटा सन्समध्ये सर्वात मोठे शेअरहोल्डर आहेत. शेअरहोल्डर या नात्याने केलेली शिफारसही सायरस मिस्त्री यांच्या निवडीमध्ये महत्वपूर्ण ठरली होती. शापूरजी-पालनजी समूहाने तडकाफडकी सायरस मिस्त्री यांना पदावरुन हटवण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.