औषध दुकानांमध्ये आता केवळ औषधांचीच विक्री हंसराज अहीर यांचे संकेत : औषधांच्या गटात न मोडणार्या वस्तूंची विक्री नाही
By admin | Updated: June 6, 2015 00:34 IST
जयशंकर गुप्त/ नवी दिल्ली देशभरातील औषधांच्या दुकानात (मेडिकल स्टोर्स) यापुढे औषधांव्यतिरिक्त अन्य उत्पादने विकता येणार नाही. लहान मुलांसाठीचे तेल, साबण, पावडर,बेबी फूड्स, पौष्टिक आहार ही आणि तत्सम उत्पादने औषधांच्या गटात मोडत नाहीत. त्यामुळे अशी उत्पादने औषधांच्या दुकानात विक्रीस ठेवण्यावर बंदी घालण्याचा विचार केंद्र सरकारने चालवला आहे. केंद्रीय रसायन आणि उत्पादन ...
औषध दुकानांमध्ये आता केवळ औषधांचीच विक्री हंसराज अहीर यांचे संकेत : औषधांच्या गटात न मोडणार्या वस्तूंची विक्री नाही
जयशंकर गुप्त/ नवी दिल्ली देशभरातील औषधांच्या दुकानात (मेडिकल स्टोर्स) यापुढे औषधांव्यतिरिक्त अन्य उत्पादने विकता येणार नाही. लहान मुलांसाठीचे तेल, साबण, पावडर,बेबी फूड्स, पौष्टिक आहार ही आणि तत्सम उत्पादने औषधांच्या गटात मोडत नाहीत. त्यामुळे अशी उत्पादने औषधांच्या दुकानात विक्रीस ठेवण्यावर बंदी घालण्याचा विचार केंद्र सरकारने चालवला आहे. केंद्रीय रसायन आणि उत्पादन मंत्री हंसराज अहीर यांनी शुक्रवारी येथील इंडियन मेडिकल असोसिएशन मुख्यालयात(आयएमए) जनऔषधी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी याबाबतचे संकेत दिले. या निर्णयाचा फटका मॅगीच्या गुणवत्तेवरून वादात सापडलेल्या ‘नेस्ले’ कंपनीलाही बसणार आहे. कारण या निर्णयानंतर या कंपनीचे मॅगी आणि सेरेलॅक सारखी उत्पादने औषधांच्या दुकानांवर विक्रीस ठेवण्यास मनाई असेल. लवकरच सर्व राज्यांना याबाबतचे निर्देश दिले जातील, असे अहीर यांनी सांगितले.औषधांच्या दुकानांवर सेरेलॅकसारखी बेबी फूड्स, हॉर्लिक्स, जॉन्सन अँण्ड जॉन्सन बेबी सोप, तेल, पावडर आणि अशाप्रकारची अनेक बॅण्डची उत्पादन अधिक दराने विकल्या जात आहेत, असे सांगत त्यांनी एक उदाहरणही दिले. 20 रुपये किलोचा गहू आणि 30 रुपये किलोची साखर मिसळून तयार करण्यात येणारे सेरेलॅक औषधांच्या दुकानांवर 400 रुपये किलो दराने विकले जात आहे. लोक याला औषध म्हणून खरेदी करतात. उत्पादन खर्च आणि उत्पादनाची किंमत यांच्यातील फरकाची चौकशीही व्हायला हवी. अशाप्रकारची औषधांच्या गटात न मोडणारी उत्पादने किराणा वा जनरल स्टोर्समध्ये विकली जायला हवी. औषधांच्या दुकानात केवळ औषध आणि वैद्यकीय उत्पादने विकली जायला हवीत, असेही ते म्हणाले.बॉक्स जनऔषधी केंद्र उभारण्यावर भर देशभर जनऔषधी केंद्र उभारण्यावर सरकारचा भर आहे. आयएमए आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने देशभरात येत्या दोन वर्षांत तीन हजार जनऔषधी केंद्रे उभारण्यात येतील. याप्रकारची 1600 केंद्र केवळ आयएमएच्या शाखांमध्ये उघडली जातील. ही केंद्रे उघडण्यासाठी डी फॉर्म आणि बी फॉर्म केलेल्या पण बेरोजगार असलेल्या युवांना प्राधान्य दिले जाईल, अशी माहितीही अहीर यांनी यावेळी दिली. देशात महागलेली आरोग्य सेवा आणि महागड्या औषधांचा उल्लेख करीत ते म्हणाले की, आता लोकांना उपचारासाठीही कर्ज घ्यावे लागत आहे. मात्र जनऔषधी केंद्रांवर केवळ स्वस्त आणि जेनेरिक औषधांची विक्री होईल. आयएमएच्या सहकार्याने देशभरातील डॉक्टरांना रुग्णांना केवळ जेनेरिक औषधे लिहून देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. डॉक्टरांकडून या निर्देशांची अंमलबजावणी होईल, अशी ग्वाही आयएमएच्यावतीने देण्यात आली आहे.