हृदयद्रावक! १६ तासांनंतर बोअरवेलमधून बाहेर काढण्यात यश, पण उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 14:25 IST2024-12-29T14:23:39+5:302024-12-29T14:25:21+5:30
गुना येथे १० वर्षांच्या सुमितला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात यश आलं. मात्र उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला.

हृदयद्रावक! १६ तासांनंतर बोअरवेलमधून बाहेर काढण्यात यश, पण उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू
मध्य प्रदेशातील गुना येथे १० वर्षांच्या सुमितला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात यश आलं. मात्र उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. गुनाचे एएसपी मानसिंग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (२८ डिसेंबर) १० वर्षांचा सुमित पतंग उडवताना त्याच्याच शेतातील बोअरवेलमध्ये पडला होता. कालपासून आम्ही बचावकार्य करत होतो. सुमितला आज सकाळी ९.३० वाजता बाहेर काढण्यात आलं आहे. मुलावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र त्याला वाचवता आलं नाही.
गुना जिल्हा प्रशासन पोलिसांसह एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकाला मोठं यश मिळालं आणि १६ तासांत मुलाला बाहेर काढण्यात आलं. सुमितला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. सकाळपर्यंत प्रशासन आणि डॉक्टरांनी सुमितच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती, मात्र आता उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मुलाच्या मृत्यूचे वृत्त समजताच त्याच्या कुटुंबात व गावात शोककळा पसरली.
शनिवारी गुना येथे दहा वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला होता. घटनेची माहिती मिळताच गुना प्रशासनाने बचावकार्य सुरू केलं. यानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली. हे प्रकरण गुना जिल्ह्यातील राघोगड भागातील जंजाल भागात असलेल्या पिपलिया गावातील आहे. येथे राहणारा सुमित मीना हा १० वर्षांचा मुलगा शनिवारी संध्याकाळी पतंग उडवत असताना अचानक बोअरवेलमध्ये पडला.
सुमित अचानक कुठे गेला हे सुरुवातीला आधी कोणालाच समजलं नाही. कुटुंबीयांनी गावभर त्याचा शोध घेतला. यानंतर बोअरवेलमध्ये डोकावलं तेव्हा सुमित त्यात अडकलेला दिसला. माहिती मिळताच बचावकार्य सुरू करून जेसीबी मशीनच्या साहाय्याने बोरिंगजवळ खड्डा खोदण्यात आला.
मध्य प्रदेशमध्ये सातत्याने बोअरवेलच्या दुर्घटनांमुळे सीएम मोहन यादव यांनी कडक कारवाई केली होती. बोअरवेल उघडी ठेवल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं होतं. यासाठी शेतमालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मात्र, आजही बोअरवेल उघडं ठेवल्याने व निष्काळजीपणा केल्याने दुर्घटना होत आहेत.