'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 16:25 IST2025-04-26T16:20:36+5:302025-04-26T16:25:21+5:30
संरक्षण कारवायांचे लाईव्ह कव्हरेज टाळण्यासाठी सरकारने माध्यमांना सूचना जारी केल्या आहेत.

'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून कठोर पावलं उचलली जात आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई केली आहे. दुसरीकडे, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व माध्यमांना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षण मोहिमा आणि सुरक्षा दलांच्या हालचालींचे थेट कव्हरेज दाखवण्यास मनाई केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा सल्ला जारी करण्यात आला आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. मात्र खोऱ्यातील धोक्याची परिस्थिती अद्याप संपलेली नाही. पहलगाम हल्ल्यानंतर आता आणखी एका हल्ल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गुप्तचर संस्थांनी जारी केलेल्या अलर्टनुसार, लोकांना लष्कर-ए-तोयबाच्या धोकादायक मॉड्यूलबद्दल सावधगिरी बाळगण्यास सांगण्यात आले आहे. अशातच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने माध्यमांना सुरक्षा दलांच्या हालचालींचे थेट कव्हरेज करु नका असं सांगितले आहे.
"राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी, सर्व मीडिया प्लॅटफॉर्म, वृत्तसंस्था आणि सोशल मीडिया युजर्सना संरक्षण आणि इतर सुरक्षा-संबंधित कामकाजाशी संबंधित बाबींवर थेट वृत्तांकन करताना अत्यंत जबाबदारीने वागण्याचा आणि कायदे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. विशेषतः संरक्षण कारवाया किंवा हालचालींशी संबंधित सोर्सच्या आधारावर आलेल्या माहितीवर कोणतेही रिअल-टाइम कव्हरेज, दृश्यांचे प्रसारण करू नये. संवेदनशील माहितीचे थेट वार्तांकन केल्याने अनवधानाने विरोधी घटकांना मदत करू शकते आणि ऑपरेशनल प्रभावीपणा आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आणू शकते," असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
Ministry of Information and Broadcasting issues advisory to all Media channels to refrain from showing live coverage of defence operations and movement of security forces in the interest of national security. pic.twitter.com/MQjPvlexdr
— Ministry of Information and Broadcasting (@MIB_India) April 26, 2025
मंत्रालयाने कारगिल युद्ध आणि मुंबई दहशतवादी हल्ल्यांसह भूतकाळातील अनेक घटनांची यावेळी आठवण करुन दिली. जिथल्या कव्हरेजमुळे अनपेक्षित परिणाम झाले होते. "भूतकाळातील घटनांनी वृत्तांकनाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. कारगिल युद्ध, मुंबई दहशतवादी हल्ला आणि कंधार विमान अपहरण यासारख्या घटनांदरम्यान कोणतेही बंधन न ठेवता केलेल्या कव्हरेजमुळे राष्ट्रीय हितांवर अनपेक्षित प्रतिकूल परिणाम झाले," असेही मंत्रालयाने म्हटले.