४० मिनिटांत केला ‘गेम’
By Admin | Updated: June 11, 2015 02:47 IST2015-06-11T02:47:38+5:302015-06-11T02:47:38+5:30
भारतीय लष्कराच्या विशेष पथकाने मंगळवारी मान्यमारच्या हद्दीत घुसून केलेल्या ऐतिहासिक कारवाईत अवघ्या ४० मिनिटांत शंभरावर दहशतवाद्यांना कंठस्नान घालून आपली शक्ती सिद्ध केली

४० मिनिटांत केला ‘गेम’
नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या विशेष पथकाने मंगळवारी मान्यमारच्या हद्दीत घुसून केलेल्या ऐतिहासिक कारवाईत अवघ्या ४० मिनिटांत शंभरावर दहशतवाद्यांना कंठस्नान घालून आपली शक्ती सिद्ध केली. या मोहिमेत लष्कराने वापरलेल्या गनिमी काव्यामुळे दहशतवाद्यांना हातातील बंदूक सांभाळण्याचीही संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे मोहीम फत्ते केल्यानंतर कुठल्याही हानीशिवाय भारतीय जवान मायदेशी परतले. सूत्राच्या सांगण्यानुसार मात्र या मोहिमेत ३८ दहशतवादी ठार झाले असून, ७ जखमी आहेत.
या मोहिमेसाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी बांगलादेश दौऱ्याचा आपला कार्यक्रम बदलला, तर लष्कर प्रमुख दलबीरसिंग सुहाग यांनी आपली इंग्लंड भेट रद्द केली होती.
मणिपूरच्या चंदेल क्षेत्रात गेल्या ४ जून रोजी दहशतवाद्यांनी लष्करी ताफ्यावर केलेल्या भीषण हल्ल्यात १८ जवान शहीद झाले होते. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्याची चर्चा झाली. या बैठकीला संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, लष्करप्रमुख सुहाग उपस्थित होते.