चार वर्षांत १,८२२ घुसखोर देशाबाहेर, काँग्रेसचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 06:55 IST2018-08-07T04:29:32+5:302018-08-07T06:55:59+5:30
आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकता रजिस्टरमधून ४० लाख लोकांची नावे गायब झाल्यानंतर काँग्रेस व भाजपा एकमेकांवर आरोप करीत असून, अधिक विदेशी लोकांना कोणी बाहेर काढले, यावरून त्यांच्यात जुंपली आहे.

चार वर्षांत १,८२२ घुसखोर देशाबाहेर, काँग्रेसचा दावा
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकता रजिस्टरमधून ४० लाख लोकांची नावे गायब झाल्यानंतर काँग्रेस व भाजपा एकमेकांवर आरोप करीत असून, अधिक विदेशी लोकांना कोणी बाहेर काढले, यावरून त्यांच्यात जुंपली आहे.
एनआरसीची सुरुवात आम्हीच केली व ८२ हजार घुसखोरांना देशाबाहेर काढले होते. स्व. राजीव गांधी यांनी विदेशी नागरिकांच्या प्रश्नावर जो आसाम करार केला होता त्या पार्श्वभूमीवरच एनआरसीची सुरुवात झाली, असे सांगून काँग्रेस स्वत:कडे श्रेय घेत आहे. मात्र काँग्रेसने विदेशींनी बाहेर काढण्यासाठी काहीही केले नाही, असा भाजपाचा आरोप आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी विदेशी नागरिकांबाबत आपले धोरण काय आहे ते सांगावे, अशी मागणी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. मात्र सरकारी आकड्यांनुसार, २००५ मध्ये १४,९१६ बांगलादेशी नागरिकांना परत पाठविण्यात आले. हा आकडा २००६ मध्ये १३,६९२. २००७ मध्ये १२,१३५, २००८ मध्ये १२,६२५, २००९ मध्ये १०,६०२ व २०१० मध्ये ६,२९० होता. तसेच २०११ मध्ये ६,७६१ बांगलादेशी नागरिकांना परत पाठविले. नंतर २०१२ मध्ये ६,५३७ तर २०१३ मध्ये ५,२३४ काँग्रेस सरकारने बांग्लादेशात परत पाठविले. म्हणजेच २००५ ते २०१३ पर्यंते ८२,७२८ बांगलादेशी नागरिकांना परत पाठविण्यात आले.
>भाजपाच्या काळात...
मोदी सरकारने २०१४ मध्ये आल्यापासून पहिल्या वर्षी ८९८, २०१५ मध्ये ४७४, २०१६ मध्ये ३०८ आणि २०१७ मध्ये ५१ बांग्लादेशींना बाहेर काढले. म्हणजे ४ वर्षांत १८२२ बांगलादेशींना देशातून बाहेर काढण्यात आले.