काश्मीरमध्ये अग्नितांडव! निसर्गरम्य पहलगाममध्ये सिलिंडरचे स्फोट, तीन रिसॉर्ट्स जळून कोळसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 10:06 IST2026-03-17T10:04:23+5:302026-03-17T10:06:11+5:30
काश्मीरमधील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पहलगामच्या लारीपोरा भागात आज भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.

काश्मीरमध्ये अग्नितांडव! निसर्गरम्य पहलगाममध्ये सिलिंडरचे स्फोट, तीन रिसॉर्ट्स जळून कोळसा
काश्मीरमधील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पहलगामच्या लारीपोरा भागात आज भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत 'असल रिसॉर्ट्स'च्या तीन आलिशान इमारती जळून खाक झाल्या असून, ५० ते ६० कोटी रुपयांचे प्रचंड नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीदरम्यान झालेल्या गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला होता.
धमाक्यांमुळे मदतकार्यात अडथळा
मिळालेल्या माहितीनुसार, लारीपोरा येथील हॉटेलमध्ये अचानक आग लागली आणि काही क्षणातच तिने रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच पहलगामसह सल्लार, अनंतनाग आणि अश्मुकाम येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या हॉटेलमधील गॅस सिलिंडरचे एकामागून एक भीषण स्फोट होऊ लागल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना मदतकार्यात मोठ्या अडचणी आल्या. स्फोटांच्या तीव्रतेमुळे काही काळ मदतकार्य थांबवावे लागले होते.
कोट्यवधींची मालमत्ता राख
'असल रिसॉर्ट्स'चे व्यवस्थापक उमर हुसैन यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, "ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आमच्या रिसॉर्टच्या तीन प्रमुख इमारतींना आगीने वेढले. यात आमचे सुमारे ५० ते ६० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे." आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र शॉट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
सुदैवाने जीवितहानी टळली
पहलगाम अग्निशमन विभागाचे अधिकारी मंजूर अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन ते तीन इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. प्रशासनाकडून आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात असून, आग पूर्णपणे विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
पर्यटकांमध्ये घबराट
पहलगाम हे पर्यटकांचे आवडते ठिकाण असल्याने या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक प्रशासन सध्या आगीच्या कारणांचा शोध घेत असून, नुकसानीचा सविस्तर पंचनामा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.