शेतकऱ्यांचा ८ डिसेंबरला ‘भारत बंद’चा इशारा; आंदोलन आणखी तीव्र करण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 07:45 IST2020-12-05T01:02:10+5:302020-12-05T07:45:03+5:30
सीकरी सीमेवर पोलिसांनी शेतकऱ्यांना थोपवले आहे. बॅरिकेडस आणि दगडांनी रस्ता बंद करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचा ८ डिसेंबरला ‘भारत बंद’चा इशारा; आंदोलन आणखी तीव्र करण्याची तयारी
नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले आंदोलन नवव्या दिवशीही सुरुच आहे. आंदोलन आणखी तीव्र करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली असून याचाच भाग म्हणून ८ डिसेंबर रोजी ‘भारत बंद’चा इशारा दिला आहे.
सीकरी सीमेवर पोलिसांनी शेतकऱ्यांना थोपवले आहे. बॅरिकेडस आणि दगडांनी रस्ता बंद करण्यात आला आहे. परंतु शेतकऱ्यांनी संधी मिळताच त्यांंनी सीमा ओलांडत दिल्लीकडे येण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा बलाचा वापर करुन शेतकऱ्यांना थांबवले. शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी किमान आधारभूत मूल्यासाठी (एमएसपी) स्वतंत्र कायदा करण्यास आम्ही सरकारला भाग पाडणार असल्याची प्रतिक्रिया दिली.
सिंधु सीमेवर तृणमूलचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवर बोलणे करून देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. शेतकऱ्यांच्या अधिकारांना उद्योगपती घराण्यांना भाजपा विकत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला. दरम्यान, दिल्ली- हरयाणाच्या सिंधु सीमेवरून शेतकऱ्यांना हटवण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारी याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात वकील ओम प्रकाश परिहार यांनी दाखल केली आहे.