LOCवर कुरापत काढणे पाकिस्तानला महागात पडले, भारतीय लष्कराने चार चौक्या आणि तीन सैनिकांना गारद केले
By बाळकृष्ण परब | Updated: January 10, 2021 14:58 IST2021-01-10T14:51:49+5:302021-01-10T14:58:49+5:30
Indian Army News : पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात येत असलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरदाखल रविवारी भारती सैनिकांनी आज मोठी कारवाई केली.

LOCवर कुरापत काढणे पाकिस्तानला महागात पडले, भारतीय लष्कराने चार चौक्या आणि तीन सैनिकांना गारद केले
नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून वारंवार गोळीबार करण्यात येत असतो. मात्र आज नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराची कुरापत काढणे पाकिस्तानला चांगलेच महागात पडले. भारतीय लष्कराने कुरापतखोर पाकिस्तानी सैन्यावर प्रत्यत्तरदाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे तीन सैनिक ठार झाले. तसेच भारतीय लष्कराच्या कारवाईत पाकिस्तानच्या चार चौक्या उद्ध्वस्त झाल्या.
पाकिस्तानी सैनिकांकडून नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून नौशेरा विभागाला टार्गेट करण्यात येत होते. पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात येत असलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरदाखल रविवारी भारती सैनिकांनी आज मोठी कारवाई केली. यामध्ये तीन पाकिस्तानी सैनिक मारले गेले. यादरम्यान, अनेक पाकिस्तानी सैनिक जखमी झाले.
रविवारी पाकिस्तानकडून भारताच्या हद्दीत घुसखोरीचे कारस्थान रचण्यात आले होते. राजौरीमधील नौशेरा विभागात एलऔसीवर कलसिया विभागात सीमेपलीकडून दहशतवाद्यांची एक टोळी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होती. पाकिस्तानी सैन्याकडून या टोळीला कव्हर फायरिंग देण्यात येत होते. मात्र नियंत्रण रेषेवर सज्ज असलेल्या भारतीय जवानांनी हा हल्ला परतवून लावला. मात्र सध्यातरी या परिसरातील गोळीबार बंद आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या सैन्याने दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा गेल्या १७ वर्षांमधील विक्रम पाकिस्तानने मोडला आहे. २८ डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीवर लक्ष टाकले तर पाकिस्तानने संपूर्ण एलओसीवर ४ हजार ७०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यासाठी पाकिस्तानने छोट्या हत्यारांसोबत मोठ्या तोफांचाही वापर केला. तसेच एलओसीच्या आसपास असलेल्या गावांनाही लक्ष्य केले.