सुरेश एस डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, कटरा: जगातील सर्वात उंच असलेल्या कमानी रेल्वे पुलावरून धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस हे आता केवळ स्वप्न न उरता ती गोष्ट प्रत्यक्षात साकारली आहे. पृथ्वीवरील नंदनवन असलेल्या काश्मीरमध्ये रेल्वेतून प्रवास करणे ही एक नेत्रसुखद प्रवासाची संधी आहे. पर्यटक, प्रवासी तेथील निसर्गरम्य परिसर पाहून अतिशय आनंदी होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कटरा आणि श्रीनगर यादरम्यान धावणाऱ्या दोन खास वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. या ट्रेनमुळे प्रवासाचा कालावधी २-३ तासांनी कमी झाला आहे. तसेच, काश्मीर खोऱ्याशी सर्व ऋतूंमध्ये संपर्क राखता येईल, असा एक नवा मार्ग उपलब्ध झाला आहे. काश्मीरमधील ट्रेन खोल दऱ्या, हिमालयाच्या भव्य शिखरांचे दर्शन घडवत व घनदाट जंगलांनी वेढलेल्या पर्वतराजीतून वाट काढत धावते. शिवालिक डोंगररांगेत खोदलेल्या बोगद्यांतून आणि चिनाब नदीला प्रवास करत ही रेल्वे निसर्गाशीच जणू संवाद साधते. जम्मूतील कटरा ते श्रीनगर ही रेल्वे सफर ही देशातील सर्वात नयनरम्य प्रवासांपैकी एक ठरली आहे.
लोको पायलट मनोजकुमार मीणा यांनी सांगितले की, ही फक्त एक ट्रेन नाही, तर ही निसर्गाच्या जादूई दुनियेतील सफर आहे. जे इंग्रज करू शकले नाहीत, ते पंतप्रधान मोदींनी केले या शब्दांत मुख्यमंत्री अब्दुल्लांनी कौतुक केले.
मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर वंदे भारत ट्रेन चिनाब पुलावर पोहोचली, तेव्हा ट्रेनमधील विद्यार्थ्यांनी जय मातादीचा जयघोष केला. मोदींनीही चिनाब पुलाची पाहणी केली.
बदलत्या दृश्यांची पडते भुरळ
रेल्वे कर्मचारी साहिलकुमार म्हणाले की, ही ट्रेन काश्मीरमधील डोंगराळ भागात पोहोचते तेव्हा विविध ऋतूंमधील बदलती दृश्य भूरळ घालतात. हिमाच्छादित जंगलं, वसंतात फुललेली झाडं, उन्हाळ्यातील निसर्ग आणि शरद ऋतूतील सोनसळी छटा अशी निसर्गरूपे समोर येतात.
अभियांत्रिकी चमत्कारांनी घडलेला नवा मार्ग
काश्मीर रेल्वे मार्गातील कटरा-बनिहाल या दरम्यानचा आणखी एक अभियांत्रिकी चमत्कार म्हणजे अंजी खड्ड पूल. हा भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल आहे. ७२५ मीटर लांब आणि ३३१ मीटर उंचीचा हा पूल ९६ केबलवर उभा आहे आणि पर्यटकांसाठी ते एक खास आकर्षण आहे. २७२ किलोमीटर लांब उधमपूर-श्रीनगर-बारामुला रेल्वे प्रकल्प सुमारे ४३,७८० रुपये कोटी खर्च करून पूर्ण करण्यात आला. त्यात ३६ बोगदे (एकूण ११९ किमी) आणि ९४३ पूल आहेत. या मार्गावरून रेल्वेने प्रवास करा व भारतातील स्वित्झर्लंडचा अनुभव घ्या, असे वर्णन अनेकांनी केले आहे.
डिमोशन झाले, पण चूक दुरुस्त होईल : अब्दुल्ला
जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधानांकडे केली. ते म्हणाले की, कटरा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन झाले त्यावेळी मी एका राज्याचा मुख्यमंत्री होतो. आता मी केंद्रशासित प्रदेशाचा मुख्यमंत्री आहे. एकप्रकारे हे थोडेसे डिमोशनच झाले आहे. पण, मला विश्वास आहे की ही चूक लवकरच दुरुस्त होईल. जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल केला जाईल.