मत वाया घालवू नका, विचार करून मतदान करा; पंतप्रधान मोदींचे सभेत आवाहन, विरोधकांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 14:44 IST2025-11-04T14:43:46+5:302025-11-04T14:44:16+5:30
‘अपमान मंत्रालय’ स्थापन करा, वेळ वाचेल; प्रियांका गांधींचा टोला

मत वाया घालवू नका, विचार करून मतदान करा; पंतप्रधान मोदींचे सभेत आवाहन, विरोधकांवर टीका
सहरसा/ कटिहार : बिहारच्या विकासासाठी एनडीएच्या नेतृत्वाखाली डबल इंजिन सरकारची गरज असल्याचे नमूद करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. ३) राष्ट्रीय जनता दल (राजद) - काँग्रेस आघाडी भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाने व्यापली असल्याची टीका केली. नवतरुण मतदारांना मतदानाचे महत्त्व सांगताना मोदी म्हणाले, ‘मी पहिल्यांदा मतदान केले तेव्हा माझे मत वाया जाऊ नये, अशी इच्छा होती. तुमचेही पहिले मत वाया जाणार नाही हा विचार करून मतदान करा. तुमचे पहिले मत सरकार स्थापन करणारे असावे.’
एनडीएपूर्वी १५ वर्षे बिहारवर राज्य करणारा राजद आणि केंद्रात सहा दशके अखंडपणे राज्य करणाऱ्या काँग्रेसवर त्यांनी हल्ला चढवला. आरजेडीच्या ‘जंगल राज’मध्ये पोलिसही सुरक्षित नव्हते, असे ते म्हणाले. राजदने राज्यात काँग्रेस नेत्यांना खुजे केले आहे. राजदच्या पोस्टरवर काँग्रेस नेत्यांची छायाचित्रेच नाहीत, असे ते म्हणाले. २००५च्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी राजदने केंद्रात काँग्रेसशी हातमिळवणी करून बिहारचे प्रकल्प अडवले होते, असा आरोप त्यांनी केला. विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, ‘एक राज्यातील सर्वात भ्रष्ट कुटुंब आणि दुसरे देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब आहे. दोघे मिळून गरिबांसाठी येणारा पैसा लुटतात.’
‘अपमान मंत्रालय’ स्थापन करा, वेळ वाचेल : प्रियांका गांधी
सहरसा / लखीसराय (बिहार) : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सोमवारी येथे आयोजित जाहीर सभांतून एनडीए सरकार व पंतप्रधानांना लक्ष्य करून सरकारने एक वेगळे ‘अपमान मंत्रालय’ स्थापन करायला हवे, अशी उपहासात्मक टीका केली. वारंवार अपमानाचे आरोप करण्यात वेळ वाया घालवू नका, असे त्या म्हणाल्या. प. बंगाल, कर्नाटक असो अथवा बिहार, प्रत्येक ठिकाणी नेते अपमानाचाच मुद्दा मांडत असल्याची टीका त्यांनी केली.
तेजस्वी-तेजप्रताप परस्परांविरुद्ध
पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालुप्रसाद यादव यांचे दोन्ही पुत्र तेजस्वी आणि तेजप्रताव यादव यांनी निवडणुकीच्या रणांगणात परस्परांविरुद्ध रणशिंग फुंकले असून या दोन्ही भावांच्या आव्हानांमुळे महुआ आणि राघोपूर या मतदारसंघांतील लढती अधिक रंगतदार झाल्या आहेत. महुआमधून तेजप्रताप निवडणूक लढवणार आहेत. तर राघोपूरमधून तेजस्वी यादव मैदानात आहेत.