काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 06:14 IST2025-06-12T06:13:54+5:302025-06-12T06:14:22+5:30
Jammu & Kashmir News: संकटात सापडलेल्या पर्यटन व्यवसायास चालना देण्यात नुकतीच सुरू झालेली जम्मू-बारामुल्ला ही काश्मीरसाठीची थेट रेल्वेसेवा महत्त्वाची भूमिका बजावेल आणि ‘गेम चेंजर’ सिद्ध होईल, असा विश्वास सरकारी सूत्र आणि व्यापारी वर्गाकडून व्यक्त होत आहे.

काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
- सुरेश एस डुग्गर
जम्मू - संकटात सापडलेल्या पर्यटन व्यवसायास चालना देण्यात नुकतीच सुरू झालेली जम्मू-बारामुल्ला ही काश्मीरसाठीची थेट रेल्वेसेवा महत्त्वाची भूमिका बजावेल आणि ‘गेम चेंजर’ सिद्ध होईल, असा विश्वास सरकारी सूत्र आणि व्यापारी वर्गाकडून व्यक्त होत आहे.
या रेल्वेच्या उद्घाटनानंतर पर्यटकांकडून चौकशीसाठी संपर्क वाढला आहे, तसेच १० दिवसांचे बुकिंग फुल्ल झाले आहे. पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर येथील पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला होता.
आम्हाला मदत करा, व्यापाऱ्यांची आर्त विनंती : स्थानिक छोटे व्यापारी, विशेषतः काश्मिरी केशर, सुके मेवे, आणि पारंपरिक ‘कहवा’ मिठाई विक्रेते यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. लेथपोरा येथे सुके मेवे विकणारे मंजूर सांगतात, हल्ल्यापूर्वी जितका व्यवसाय होता, त्याच्या दहा टक्केही आता राहिलेला नाही. सरकारकडे एकच मागणे आहे. पर्यटक परत येण्यासाठी मदत करा.
नोकरीची आशा सोडली, आता स्वत:चा व्यवसाय
दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील अवंतीपोरा येथील इश्फाक अहमद व सबिया मुश्ताक या पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या दाम्पत्याने सरकारी नोकरीसाठी त्यांनी अनेक वर्षे प्रयत्न केले. मात्र, निराश न होता त्यांनी स्वतःचा फुलांचा व्यवसाय सुरू केला.
या दाम्पत्याने पुलवामात एक छोटा तुकडा भाड्याने घेतला आहे, जिथे ते पुणे आणि चेन्नईहून फुले मागवून विक्री करतात. पहलगाम घटनेचा त्यांच्याही व्यवसायावर परिणाम झाला आहे; पण ते खचलेले नाहीत.