दिल्लीतील जंतरमंतर येथे रविवारी (२९ जून) आम आदमी पक्षाच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात आले. दिल्लीतील झोपडपट्ट्या तोडण्याच्या विरोधात, हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि रेखा गुप्ता सरकारवर थेट हल्ला चढवला आणि भाजप दिल्लीतील झोपडपट्ट्या पाडण्याचा (तोडण्याचा) कट रचत असल्याचा आरोप केला.
"ज्या दिवशी ४० लाख लोक दिल्लीच्या रस्त्यावर येतील, यांना यांची आजी आठवेल" -अरविंद केजरीवाल म्हणाले, "मी भाजप एका मोठ्या नेत्यासोबत बोलत होतो, ते म्हणाले, आम्ही दिल्लीतील सर्व झोपडपट्ट्या पाडणार. दिल्लीतील सर्व झोपडपट्ट्या पाडण्याचा यांचा कट आहे. दिल्लीतील ४० लाख लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. संघटित व्हा. ज्या दिवशी ४० लाख लोक दिल्लीच्या रस्त्यावर येतील, यांना यांची आजी आठवेल. तुमची ताकद तुमची एकता आहे. संघटित व्हा."
"याच जंतरमंतरवरील आंदोलनाने काँग्रेसचा सफाया झाला..." -केजरीवाल पुढे म्हणाले, "आज या व्यासपीठावरून मी भारतीय जनता पक्षाला इशारा देत आहे की, झोपडपट्ट्या पाडणे थांबवा, आपण आपल्या मर्यादेत राहा, नाहीतर एवढे मोठे आंदोलन होईल की, तुमचे सिंहासनही हादरेल." एवढेच नाही तर, "याच जंतरमंतरवरील आंदोलनाने काँग्रेसचा सफाया झाला. आता आपण झोपडपट्ट्या तोडणे थांबवले नाही तर रेखा गुप्ता सरकार तीन वर्षांपेक्षा अधिक काळ टिकणार नाही."